

कोल्हापूर : वारंवार मुदत देऊनही जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 56 हजार नागरिकांची रेशन कार्डसाठीची ई-केवायसी झालेली नाही. अशा ई-केवायसी न करणार्या नागरिकांवर प्रशासनाची नजर आहे. मिशन सुधार मोहिमेअंतर्गत या नागरिकांचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या रेशन कार्डवर नोंद असलेल्या नागरिकांची ई-केवायसी केली जात आहे. त्याला वारंवार मुदत वाढवून दिली जात आहे, तरीही जिल्ह्यात तब्बल 16.48 टक्के नागरिकांची ई-केवायसी झालेली नाही. वारंवार मुदत वाढवून, प्रत्येक वेळी ई-केवायसी करण्याबाबत सूचना देऊनही ती होत नाही. यामुळे पुरवठा विभागाच्या द़ृष्टीने ही सर्व संशयित नावे मानली जात आहेत.
ई-केवायसी न करणार्या नागरिकांच्या वाट्याचे धान्य बंद होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात मिशन सुधार मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत ई-केवायसी न झालेल्यांचे धान्य बंद करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
* का होत नाही ई-केवायसी?
* विविध कारणांनी बाहेरगावी स्थलांतर
* वयोवृद्ध झाल्याने हाताचे ठसे जुळेनात
* कष्टाच्या कामामुळे हातांचे ठसे जुळेनात
* वयोगटानुसार आधार कार्ड अपडेट नाही
* मृत्यू होऊनही रेशन कार्डवर नावे कायम