

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या प्रशस्त इमारतीसाठी ८२ एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. याचे परिपत्रक लवकर निघण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी दिली. शनिवारी (दि. ११) कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालयातील सभागृहात तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या तैलचित्राचे अनावरण झाले. यानंतर राजर्षी शाहू महाराज मार्केट यार्डजवळ आयोजित कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे म्हणाले, न्यायव्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी सरकार हात मोकळे करत असून कोल्हापूर खंडपीठासाठीही सरकार सकारात्मक आहे. उर्वरित ५९ एकर जागेचा प्रस्तावही लवकरच मान्य होईल. कार्यक्रमासाठी उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय अहुजा, वृषाली जोशी, शैलेश ब्रह्मे, मेहरोज अशरफ खान पठाण, नंदेश देशपांडे, संदेश पाटील, जिल्हा न्यायाधीश ए. एम. पाटील, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल, बार कौन्सिलचे सदस्य संग्रामसिंह देसाई, मिलिंद थोबडे, विवेक घाटगे आदी उपस्थित होते. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी प्रास्ताविक केले.
७५० वकिलांसाठी चेंबर्सची व्यवस्था
८२ एकर जागेत खंडपीठाच्या दिमाखादार इमारतीचा आराखडा तयार केला आहे. दोन भूखंडांमधून राज्य मार्ग प्रस्तावित आहे. याला लागूनच बार असोसिएशनसाठी इमारत प्रस्तावित आहे. यामध्ये पाच जिल्ह्यांतील वकिलांसाठी ७५० चेंबर्सची उभारणी होणार आहे. न्यायाधीशांचे बंगले, विधी व न्याय प्राधिकरण अशा इमारतींचे नियोजन केले आहे.
१७ ऑगस्टला वर्षपूर्ती
१७ ऑगस्ट २०२५ हा कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांतील वकील आणि पक्षकारांसाठी सोन्याचा दिवस होता. सर्किट बेंचच्या वर्षपूर्तीनिमित्त १७ ऑगस्टला कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासाठी तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी वकिलांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना घुगे यांनी दिल्या.