

कोल्हापूर : कोगे (ता. करवीर) येथील राजाराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत ८३ लाख ५१ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष, लेखापरीक्षकांसह १७ जणांवर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. २०१९ ते २०२४ या कालावधीत कर्जवाटपात गैरप्रकार करून हा अपहार केल्याचे लेखापरीक्षणात समोर आले आहे. याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक प्रतापसिंह बाबासाहेब काशीद (५४, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष बळीराम श्रीपती चव्हाण, उपाध्यक्ष रंगराव यशवंत मिठारी, तत्कालीन लेखापरीक्षक आर. बी. मोरे, एस. बी. ढालाईत, तत्कालीन व्यवस्थापक संभाजी यशवंत चव्हाण, संचालक हरीश पांडुरंग घराळ, बाळासो ज्योती पाटील, पंढरीनाथ गणपती खाडे, कृष्णात ज्योतिराम पाटील, चंद्रकांत दिनकर सुतार, कृष्णात गणपती जाधव, शोभा जिवबा मांगोरे, रत्नाबाई हिंदूराव चव्हाण, प्रकाश शिवाजी वाडकर, संजय शंकर मोरे, मल्हारी मारुती कांबळे आणि दीप्ती अनिकेत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.