

कोल्हापूर : रमणमळा येथील गर्ल्स होस्टेलच्या क्वॉटर्समध्ये राहणाऱ्या रेक्टरच्या घरातून साडेसात तोळे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम चांदीचे बिस्कीट चोरट्यांनी लंपास केले. ५ जानेवारी ते २ सप्टेंबरदरम्यान ही घटना घडली. याबाबतची फिर्याद नीता प्रमोद आढाव (वय ४५, रा. रमणमळा, कोल्हापूर) यांनी बुधवारी (दि. २) शाहूपुरी पोलिसांत दिली.
नीता आढाव रमणमाळ्यातील एका गर्ल्स होस्टेलमध्ये रेक्टर म्हणून नोकरीस आहेत. होस्टेलमधील ‘बी’ इमारतीच्या रूम नंबर ८ मध्ये मुलीसोबत त्या राहण्यास आहेत. ५ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी साडेसात तोळ्याचे दागिने कपाटातील लॉकरमध्ये ठेवले होते. गणपतीसाठी अमरावती येथे मूळ गावी जाण्यासाठी त्यांनी बुधवारी (दि. २) कपाटाचे लॉक उघडून बघितले असता, त्यांना कपाटातील लॉकरमध्ये दागिने नसल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
२०० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीटही लंपास
१४ ग्रॅम सोन्याचा हार, १४ ग्रॅमचे मंगळसूत्र, १० ग्रॅमचे लक्ष्मी आकाराचे पेंडल, १० ग्रॅमचा कॉईन, ५ ग्रॅमची चेन, ५ ग्रॅमच्या सोन्याचे वळे, ५ ग्रॅमची चेन, १३ ग्रॅमची कर्णफुले, यासह सोन्याचे कॉईन असा सुमारे साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम वजनाचे चांदीचे बिस्कीट चोरट्यांनी लंपास केले.
किल्ली हरवली अन्...
नीता आढाव यांच्या कपाटाची किल्ली गेल्या चार महिन्यांपासून हरवली होती. त्यामुळे त्यांनी दागिन्यांकडे पाहिले नाही. गावी जाणार असल्यामुळे त्यांनी बुधवारी कपाटाची दुसरी किल्ली करून घेतली आणि यानंतर कपाट उघडले असता त्यांना दागिने गायब झाल्याचे दिसून आले.