

एकनाथ नाईक
कोल्हापूर : देशभरात आज अवयवदान दिन साजरा होत असतानाच किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. देशात तब्बल ७३,६४६ रुग्ण किडनी प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात २०२१ ते २०२५ या पाच वर्षांत ६,२२५ किडनी प्रत्यारोपण झाले; मात्र प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २७ जुलै २०२६ रोजीची ही आकडेवारी केंद्र सरकारने दिली आहे.
महाराष्ट्रातील किडनी प्रत्यारोपणाची संख्या दरवर्षी वाढत आहे. २०२१ मध्ये ९२८, २०२२ मध्ये १,०५६, २०२३ मध्ये १,३०५, २०२४ मध्ये १,४६१ आणि २०२५ मध्ये १,४७५ प्रत्यारोपण झाले. म्हणजेच पाच वर्षांत प्रत्यारोपणाच्या संख्येत तब्बल ५९ टक्क्यांची वाढ झाली. मात्र, दुसरीकडे देशभरातील ७३ हजारांहून अधिक रुग्णांची प्रतीक्षा यादी अवयवांची मागणी आणि उपलब्धता यातील मोठी दरी अधोरेखित करते.
पाच वर्षांत १३३ जणांचा ‘वेटिंग’मध्ये मृत्यू
किडनी मिळण्याची प्रतीक्षा करताना महाराष्ट्रातील ५० रुग्णांचा २०२१ मध्ये मृत्यू झाला होता. २०२२ मध्ये ९, २०२३ मध्ये ३०, २०२४ मध्ये २९ आणि २०२५ मध्ये १५ रुग्णांचा मृत्यू झाला. पाच वर्षांत एकूण १३३ रुग्णांनी किडनीच्या प्रतीक्षेत जीव गमावला. विशेष म्हणजे, २०२१ च्या तुलनेत २०२५ मध्ये प्रतीक्षा यादीतील मृत्यू ७० टक्क्यांनी घटले आहेत.