

सुनील कदम
कोल्हापूर : महामार्गांसाठी म्हणून गेल्या दहा-बारा वर्षांत जवळपास सात लाखांहून अधिक वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. परिणामी राज्यातील झाडून सगळे महामार्ग उजाड, वैराण होऊन हॉटस्पॉट बनले आहेत.
राज्यात सध्या 18 हजार 459 किलोमीटर लांबीचे 16 राष्ट्रीय महामार्ग आहेत; तर 33 हजार 705 किलोमीटर लांबीचे 366 राज्य महामार्ग आहेत. या सगळ्या महामार्गांचा गेल्या दहा-बारा वर्षांत विस्तार अथवा रुंदीकरण झालेले आहे. कुठे दोनपदरी, चारपदरी तर कुठे चारपदरीचे सहा-आठपदरी असे रुंदीकरण झाले आहे.
यापैकी अनेक महामार्ग हे फार प्राचीन काळापासून वापरात होते आणि या महामार्गांच्या दुतर्फा डेरेदार वृक्षांची रांग होती. पण रुंदीकरण करताना या महामार्गावरील बहुतेक सगळ्या वृक्षांची कत्तल झालेली दिसते. हा आकडा साधारणत: सात लाखांच्या घरात आहे.
पर्यावरणाची राखरांगोळी!
या वृक्षसंहारामुळे त्या त्या भागातील पर्यावरणाची पार राखरांगोळी झाली आहे. वृक्षतोड झालेल्या भागातील जैवविविधता लयाला गेली असून अवघे पर्यावरणच उद्ध्वस्त झालेले दिसत आहे. आज राज्यातील एकाही महामार्गावर झाडांची सावली म्हणून बघायला मिळत नाही. त्यामुळे उजाड आणि वैराण वाळवंटातून प्रवास केल्यासारखे वाटते. भर उन्हाळ्यात या मार्गावरून प्रवास करणे जवळ जवळ अशक्य होऊन जाते. या भयावह वृक्षतोडीचा परिणाम म्हणून दिवसेंदिवस महामार्गांच्या भागात तापमान वेगाने वाढताना दिसत आहे. पर्यायी वृक्ष लागवड ही केवळ कागदावरच दिसत आहे.
महामार्गांसाठी किती हा वृक्षसंहार?
* 1.65 लाख झाडांची समृद्धी महामार्गासाठी कत्तल
* 41 हजार झाडांचा नागपूर-रत्नागिरी महामार्गासाठी संहार
* 46 हजार वृक्षांवर पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासाठी कुर्हाड
* 25 हजारांवर झाडे कोल्हापूर-पुणे महामार्गाच्या कामासाठी तोडली
* 23 हजार झाडे पुणे-नाशिक महामार्गासाठी नष्ट केली
* 1.5 लाखांहून अधिक झाडांवर मुंबई-गोवा महामार्गासाठी कोयता
(अशा पद्धतीने राज्यातील बहुतांश महामार्गांच्या कामागणिक हजारो
वृक्षांची अक्षरश: कत्तल करण्यात आलेली दिसते.)