कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड येथील ओंकार चौक येथे आज (दि. ३) स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा पार पडली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कारखानदार ज्याप्रमाणे एकत्र आलेले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही ऊस दरासाठी एकजूट होणं आवश्यक असल्याचे आवाहन केले. या सभेसाठी गोपाळ चव्हाण, माजी नगराध्यक्ष जयराम पाटील, रावसाहेब पाटील, सावकार मदनाईक, सागर शंभुशेट्टी, आण्णासाहेब जोंग, सचिन शिंदे आणि अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले की, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे तसेच शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांचे राजकीय विरोधक असतानाही शेतकऱ्याला दर द्यावा लागतो म्हणून एकत्र येतात. मात्र आता शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केला पाहीजे. कारखानदारांप्रमाणे तुम्ही देखील एकसंघ होऊन कारखानदारांचा हिशोब चुकता केला पाहिजे, असे आवाहन शेट्टी यांनी केले.
पुढे म्हणाले की, आम्ही चळवळीच्या माध्यमातून 100 रुपये घेतले आहेत म्हणजे आम्ही यावर समाधानी आहोत असे नाही उर्वरित पैसे घेण्यासाठी कारखानदारांना गुडघे टेकायला लावू असा इशाराही दिला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना मादनाईक म्हणाले, ऊस दराची आणि पाठीमागील पैशासाठीची शेतकऱ्यांची चळवळ कारखानदारांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न केला मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघटनेच्या आंदोलनावर विश्वास होता. म्हणून त्यांनी ऊसतोड घेतली नाही या विश्वासाच्या जोरावर पाठीमागचं काही देता येत नाही आमचा हिशोब झाला आहे.म्हणणाऱ्या कारखानदाराकडून शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून मागील 50 ते 100 रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडले हेच चळवळीचं खरं यश आहे. असे सांगत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर टीकास्त्र सोडलेे.