कोल्हापूर : ऊस दरावरून 'बिद्री'ची ऊसतोड बंद करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
बिद्री; पुढारी वृत्तसेवा : यावर्षीच्या गळीत हंगामातील ऊसाला टनास ३५०० रुपये दर जाहिर करावा, अन्यथा कार्यक्षेत्रातील ऊस तोड होवू दिली जाणार नाही, असा इशारा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बिद्री साखर कारखान्याची ऊसतोड बंद पाडली. बिद्री परिसरातील सोनाळी, पिराचीवाडी येथे ऊस वाहतूक अडवली तसेच ऊसतोड बंद पाडली. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्यासह नारायण कुंभार, नितीन खोत, शुभम पाटील, रोहीत टिप्पे, भिकाजी भोसले सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे म्हणाले, ऊस शेती करण्यासाठी मशागत, खतांचे दर व राबणूक याचा खर्चाचा मेळ पहाता ऊसशेती परवडत नाही. यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे किमान टनास ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. ही आमची रास्त मागणी आहे. पण कारखानदार दर जाहीर न करता ऊसतोडी देत आहेत. शेतकरी ही रानं मोकळ करण्याच्या उद्देशाने ऊस तोडी घेत आहे. थोडा धीर धरा. ऊस क्षेत्र कमी आहे. त्यामुळे योग्य दर मिळू शकेल असे भोकरे यावेळी म्हणाले.