विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : विशाळगड परिसरात गेली दोन दिवस मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कासारी धरण पाणलोट क्षेत्रात गत २४ तासात १८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर २६१९ मिमी पाऊस बरसला असून गतवर्षी याच तारखेला २२८५ मिमी पाऊस झाला होता. गतवर्षीपेक्षा पावसाने सरासरी ओलांडून जादा पाऊस झाल्याने धरण समाधान व्यक्त होत आहे. कासारी धरण सध्या ८२.०९ टक्के भरले असून कासारी धरणातून कासारी नदीत १ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कासारी धरण शाखा अभियंता एस.एस.लाड व आय.जी.नाकाडे यांनी दिला आहे.
गेल्या २४ तासांत धरणात ६६ दलघफु इतका पाणीसाठ्यात वाढ झाली आहे . धरण २.२८ टीएमसी इतके भरले असून धरणाची पाणीपातळी ६२०.२० मी इतकी आहे, ६४.४९ दलघमी इतका पाणीसाठा धरणात आहे. कासारी नदीपात्रात एक हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने यवलूज, पुनाळ तिरपन, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजारभोगाव, पेंढाखळे, करंजफेन, कुंभेवाडी हे बंधारे पाण्याखाली आहेत.
कासारी मध्यम प्रकल्प,गेळवडे ता. शाहूवाडी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे करिता मंजूर धरण द्वार परिचलनानुसार धरणाच्या वक्र द्वाराद्वारे ७५० क्यूसेस व वीज निर्मिती गृहाद्वारे २५० क्यूसेस असा एकूण १ हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग कासारी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तरी कासारी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा व सावधानतेचा इशारा देणेत येत आहे.
– एस.व्ही.दावणे (उपविभागीय अभियंता)
कडवी मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असलेने जलाशय साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत धरण ९७ भरले असून उद्या दि २८ रोजी पहाटे ४ ते ५ च्या दरम्यान धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ३०० ते ४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत विद्युतनिर्मिती गृहातून १८० क्यूसेस विसर्ग सुरू आहे.
धरणाच्या संडव्यावरून विसर्ग सुरू झाल्यानंतर एकूण ५०० ते ६०० क्यूसेस विसर्ग नदीपात्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीपातळीमध्ये वाढ होणार असून, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
-अजय पुनदीकर, कडवी धरण शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग.
ऐतिहासिक पावनखिंडिला भेट देणाऱ्या पर्यटक नागरिक यांना बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळांपर्यंतच प्रवेश करून दर्शन घेता येणार आहे. समाधीच्या मागील बाजूस ४० फूट खोल खिंड/घळई/ दरी असलेने तसेच पावसाचे येथे प्रमाण अधिक असल्याने जीवितहानी होण्याची शक्यता असलेने समाधीच्या मागील परिसरात, शिडीवरून खाली पाण्यात उतरण्यास पर्यटक व नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे अन्वये कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, तरी पर्यटकांनी व नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.
-रामलिंग चव्हाण, तहसीलदार (शाहूवाडी).
हेही वाचा