कोल्हापूर : राधानगरी धरण ८५% भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे धुमशान सुरूच असून धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. आज (दि. २३) धरण 85 टक्के भरले असून पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सात फूट पाणी कमी आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
रविवारी (दि. २३) सकाळ पर्यंत चोवीस तासात तब्बल 211 मिमी इतका पाऊस झाला. तर दिवसभरात 70 मिमी पाऊस झाला असून जूनपासून आज अखेर 1990 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात 7083.75 द.ल.घ.फु. इतका पाणी साठा असून पाणी पातळी 340.50 इतकी झाली आहे. खासगी वीजनिर्मितीसाठी धरणातून 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असून सध्याची पूर परिस्थिती पाहता नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत .