

दिलीप भिसे
कोल्हापूर : साठ दिवसांत गुंतवणुकीवर दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवत एका कथित आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे दहा हजार गुंतवणूकदारांची तब्बल ५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. एजंटांच्या साखळीमार्फत व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, फळ विक्रेते आणि लहान उद्योजकांना गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले होते.
काही गुंतवणूकदारांना मुदत पूर्ण झाल्यानंतर दामदुप्पट परतावा देण्यात आल्याने कंपनीबाबत विश्वास निर्माण झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक जमा करण्यात आली. मात्र काही महिन्यांपासून मुदत पूर्ण झालेल्या गुंतवणूकदारांना ना मुद्दल मिळत आहे, ना आश्वासित परतावा. कळंबा, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, कसबा बावडा, पाचगाव, मोरेवाडी, गांधीनगर, इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसरातील नागरिकांनी ३० हजारांपासून ते १० लाख रुपयांपर्यंतच्या रकमा गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. पाचगावातील महिलेने दागिने गहाण ठेवून ६० हजार रुपये गुंतविल्याचेही सांगण्यात आले. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची गुरुवारी मार्केट यार्डात बैठक झाली.
...तर गुन्हा दाखल : पोलिस अधीक्षक
शहर व जिल्ह्यातील गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणूकप्रकरणी अद्याप तक्रार दाखल झाली नाही. तक्रार येताच चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.