महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश लागू | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून बंदी आदेश लागू

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदिका संघटनेच्या महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष करून तोडफोड केली जात आहे. यामुळे कायदा व सुव्यस्था बिघडू नये यासाठी दि.9 ते 23 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हद्दीत कन्नड वेदिका संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील वाहनांना लक्ष्य करून नुकसान करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कन्नड भाषिकांना लक्ष्य करणे तसेच कर्नाटकातील प्रवासी वाहने, एस. टी. बसेस यांना अडवून त्यांचे नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सीमावर्ती भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
कोगनोळी टोलनाका हा मुख्य नाका असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केली जातात. कोल्हापूर व कर्नाटक सीमा जोडणारे तांदूळवाडी ते कोगनोळी टोल हा सुमारे 50 कि.मी अंतराचा असल्याने आंदोलनाकरिता नॅशनल हायवेवर पडसाद उमटणेची शक्यता आहे.

शनिवारी (दि. 10) कर्नाटक सरकारविरोधात महाविकास आघाडीकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ येथे निषेध व्यक्त करणार आहेत. सीमावाद प्रश्न न मिटल्यास कोल्हापूरसह महाराष्ट्र बंदचा इशारा महाविकास आघाडीने दिला आहे.

आदर्श आचारसंहिता लागू

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. या काळात पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमविणे, मिरवणुका काढणे व सभा घेण्याला बंदी आहे. सर्व सण, उत्सव, जयंती, यात्रा शांततेत साजरे करण्याकरिता जमा होणारा जनसमुदाय यांना तसेच लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, अंत्ययात्रा इत्यादींना हा नियम लागू असणार नाही.

Back to top button