कोल्हापूर : पांडवरूपी जनताच महाडिकांचे काय करायचे ते करेल | पुढारी

कोल्हापूर : पांडवरूपी जनताच महाडिकांचे काय करायचे ते करेल

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्याच्या राजकारणात महाभारत घडणार आहे, असे म्हणणार्‍यांना पांडवांच्या रूपाने जनताच उत्तर देईल. त्यांचे काय करायचे ते करेल. आम्ही रामायण करणारी मंडळी आहोत, असे टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांनी शुक्रवारी खा. धनंजय महाडिक यांना दिला. दरम्यान, यासंदर्भात महाडिक यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी थोडं थांबा. मी योग्यवेळी याचे उत्तर देणार आहे, असे सांगितले.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सोमवारी सर्वसाधारण सभा होत आहे. या सभेच्या पूर्वतयारीसाठी गोकुळच्या संचालकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीनंतर पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. दही हंडीच्या कार्यक्रमात खा. धनंजय महाडिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात महाभारत घडणार आहे. वाईटाचा नाश होणार असल्याचे वक्‍तव्य केले होते.

यासंदर्भात विचारले असता आ. पाटील यांनी खा. महाडिक यांच्या या वक्‍तव्याचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही देखील रामायण करणारी मंडळी आहोत, महाभारत घडलं, तर जनताच पांडवाचे रूप घेऊन त्यांचे काय करायचं ते करेल, असे सांगितले.

गेल्या अडीच वर्षांत आपण व आ. हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचे काम केले आहे. विमानतळासाठी निधी आणला. सर्वांगीण विकास हेच आमचे लक्ष होते. चांगलं जे करता येईल ते आम्ही करत असतो. महाभारत घडलं, तर जनता पांडवाचं रूप घेऊन महाडिकांचे काय करायचं ते करेल. निवडणुका अजून लांब आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात जे बोलायचं ते बोलू, असेही ते म्हणाले.

खा. मंडलिक स्थानिक पातळीवर आमच्यासोबत

खा. संजय मंडलिक जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले असले तरी स्थानिक पातळीवर ते आमच्या सोबतच असतील याची खात्री आहे. यासंदर्भात खा. मंडलिक यांच्याशी अनेकवेळा चर्चा देखील झाली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

Back to top button