तृतीयपंथीयांच्या सबलीकरणासाठी केडीसी आघाडीवर
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा तृतीयपंथीयांनाही सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या सबलीकरणाची गरज आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सबलीकरणासाठी जिल्हा बँक आघाडीवर असेल, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कळंबा (ता. करवीर) येथील अर्धनारी तृतीयपंथी महिला बचत गटाला पासबुकाचे वितरण बँकेच्या मुख्य कार्यालयात आ. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
समाजात तृतीयपंथीयांनाही पुरुष व महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी जिल्हा बँकेने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. तृतीयपंथी बचत गटांना सहा महिन्यांतच उद्योग-व्यवसायासाठी कर्जपुरवठाही केला जाईल. पहिल्या टप्प्यात तृतीयपंथीयांच्या शहरातील बचत गटांना त्यानंतर तालुक्यात बचत गट स्थापन करण्यास चालना दिली जाईल, असेही आ. मुश्रीफ म्हणाले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अपंग, वयोवृद्ध, वेश्या व्यवसायातील महिला, मानवी मैला वाहतूक करणार्या व्यक्ती व तृतीयपंथीय यासारख्या विशेष व्यक्तींचे गट स्थापन करण्यासाठी बँकेने पुढाकार घेतला आहे, असे बँकेच्या महिला विकास कक्षाच्या उपनिरीक्षक सौ. गिरीजा पुजारी यांनी सांगितले. यावेळी संचालक संतोष पाटील, सुधीर देसाई, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, अर्धनारी तृतीयपंथी महिला बचत गटाच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर, सचिव अंकिता मयुरी आळवेकर आदी उपस्थित होते.