महात्मा गांधी खून खटल्यातील कागदपत्रे पुन्हा तपासावित
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी यांच्या खून खटल्यातील कागदपत्रे पुन्हा तपासल्यास अनेक बाबी समोर येतील. त्यामुळे या खटल्यातील कागदपत्रे पुन्हा तपासली पाहिजेत अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांनी केली. जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अशोककुमार पांडे उपस्थित होते.
पांडे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या खूनामागे मोठे षड्यंत्र होते. गांधी खून खटल्यात पोलिस तपासात अनेक त्रुटी असल्याचे कपुर कमिशनच्या अहवालात म्हटले आहे. महात्मा गांधी यांचा खून करण्यासाठी नथुराम गोडसेकडे इटालियन बनावटीचे पिस्तूल कसे आले? याचा तपास नीट झालेला नाही. यामध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. या पिस्तुलाचा तपास व्यवस्थित झाला असता तर या षड्यंत्राचे धागेदोरे अनेक बड्या हस्तीपर्यंत पोहोचले असते.
तुषार गांधी म्हणाले, म.गांधी यांच्यानंतर देखील विचारवंतांना संपविण्याचे काम सुरुच आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हे याचाच भाग आहेत. खोटा इतिहास लिहिण्याचे काम सुरू आहे. यातूनच 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिल्याने गांधींचा खून केला हा खोटा प्रचार केला जातोय.