चांदोलीचे चारही दरवाजे उघडले | पुढारी

चांदोलीचे चारही दरवाजे उघडले

शित्तूर वारुण : पुढारी वृत्तसेवा चांदोली धरणक्षेत्रात पडणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी चांदोली धरणाचे चारीही दरवाजे आज सोमवार (दि. 8) रोजी दुपारी तीन वाजता उघडण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाज्यातून 1325 क्यूसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून 1675 क्यूसेक असा एकूण 3000 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी. असा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या चोवीस तासात 64 मिलिमीटर पाऊसाची नोंद येथे झाली आहे. या पावसामुळे धरणात 9 हजार 851 क्यूसेकपाण्याची आवक सुरु आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणार्‍या पाण्याची आवक यामुळे गेल्या 24 तासात धरणाची पाणीपातळी 1.3 मीटरने वाढली आहे.

चांदोली धरणातून सुरू असलेल्या 3000 क्यूसेक पाण्याच्या विसर्गामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. हे पाणी नदीकाठच्या पोटमळीत शिरले असून नदीकाठची भात व ऊस शेती पाण्याखाली गेली आहे. गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 64 मी.मी. इतक्या तर सकाळी आठ ते चार वाजेपर्यंतच्या आठ तासांत 35 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर धरण क्षेत्रात 1487 मी. मी. पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे. 34.40 टिएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या चांदोली धरणाची पाणी पातळी सध्या 621.40 मीटरवर पोहचली आहे. धरणात सध्या 821.53 द.ल.घ.मी म्हणजेच 29.01 टिएमसी इतका पाणीसाठा झाला असुन धरण 84.33 टक्के इतके भरले आहे. धरणाची पाणीपातळी वाढल्यामुळे बंद असलेली वीजनिर्मिती आता पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.

Back to top button