कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ प्रश्नी तातडीची बैठक घ्यावी : क्षीरसागर | पुढारी

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ प्रश्नी तातडीची बैठक घ्यावी : क्षीरसागर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ प्रश्नासंदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी नगरविकामंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी हद्दवाढ प्रश्नी मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

राजेश क्षीरसागर यांनी आपल्या निवेदात म्हटले की, ‘कोल्हापूर नगरपालिकेचे १५ डिसेंबर १९७२ रोजी महानगपालीकेत रुपांतर करण्यात आले. परंतु, महानगरपालिकेत रुपांतर करताना नगरपालिकेच्या असणाऱ्या क्षेत्रफळावरच रुपांतर झाल्याने कोल्हापूर महानगरपालिका हद्दवाढ झाली नाही.

‘महानगरपालिकेची हद्दवाढ रखडल्याने शहराच्या विकासावर मर्यादा येत आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर असताना हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास दिल्या होत्या, परंतु, यास सुमारे सात महिन्यांचा कालावधी उलटला असून, हद्दवाढी संदर्भात मंत्रालय स्तरावर तातडीची बैठक घ्यावी.’

ते निवेदनात पुढे म्हणाले की, ‘सद्या राज्यात कोल्हापूर महानगरपालिका ही सर्वात लहान क्षेत्रफळ असणारी एकमेव महानगरपालिका ठरत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची हद्दवाढ व्हावी, ही कोल्हापूर वासीयांची गेली कित्येक वर्षांची मागणी आहे. याबाबत अनेक आंदोलने झाली आहेत. मी स्वतः सन २०१६ मध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर हद्दवाढी साठी आमरण उपोषण केले आहे. त्यावेळी काही लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे कोल्हापूर शहरास प्राधिकरण मंजूर करण्यात आले.

‘परंतु, प्राधिकरणाचे काम पूर्णत: ठप्प असल्याने शहराचा विकास खुंटला आहेच. यासह नागरिकांसमोर बांधकाम परवान्या सारख्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. वास्तविक पाहता शहराची हद्दवाढ ही विकासाच्या दृष्टीने नैसर्गिक प्रक्रिया आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता पुणे, ठाणे, संभाजीनगर, नाशिक या महानगरपालिकेच्या हद्दवाढ अनेकवेळा झाल्याने ही शहरे विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहेत.’

क्षीरसागर पुढे म्हणाले की, ‘पुणे महानगरपालिकेची नुकतीच तब्बल १२ वेळा हद्दवाढ करण्यात आली आहे. परंतु कोल्हापूर शहर हद्दवाढी अभावी भकास होत चालले आहे. शहराची हद्दवाढ झाली तर नक्कीच महानगरपालिकेचे आर्थिक उत्पनात वाढ होवून खऱ्या अर्थाने शहराचा विकास साधता येणार आहे. यासह केंद्र व राज्य शासनाच्या लोकसंखेच्या आधारावरील सर्व विकासकामांना निधी मिळू शकणार आहे.’

जानेवारी २०२१ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर असताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी बाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनास दिल्या होत्या. यावर कोल्हापूर महानगरपालिका प्रशानाने कोणती कार्यवाही केली, याचा आढावा घेण्याकरिता मंत्रालय स्तरावर संबधित सर्व अधिकारी यांचे समवेत तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येवून कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढी संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे.

Back to top button