नवनवीन उपचार पद्धतींमुळे कर्करोगावर मात शक्य : डॉ. शिवछंद
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कर्करोगासारख्या गंभीर आजारावर होणारे अविरत संशोधन आणि त्यापासून उपलब्ध झालेल्या नवनवीन उपचार पद्धती, औषधांमुळे दिवसेंदिवस कर्करोगावर मात करणार्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगावरील उपचारांदरम्यान शरीरावर होणार्या दुष्परिणामांचे प्रमाणही कमी झाले आहे. वेळेत निदान, योग्य मार्गदर्शन, अचूक व नियमित उपचार ही कर्करोगावर मात करण्याची त्रिसूत्री आहे, असे प्रतिपादन कर्करोग तज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद यांनी केले.
जून महिना हा ‘कॅन्सर सर्वायव्हर मंथ’ आणि जून महिन्यातील पहिला रविवार हा ‘कॅन्सर सर्वायव्हर’ डे म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मुंबई ऑन्कोकेअरच्या कोल्हापूर शाखेत कर्करोगमुक्त झालेल्या रुग्णांचा अभिनंदन सोहळा झाला. संबंधित रुग्णांवर डॉ. शिवछंद यांनी उपचार केले. कर्करोगमुक्त झालेल्या व्यक्तींचा सन्मानपत्र, तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला. डॉ. शिवछंद म्हणाले, कर्करोगी रुग्णांना शारीरिक, मानसिक, आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
अशा प्रतिकूल स्थितीत जगण्याची जिद्द आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कर्करोगावर ते मात करतात. मुंबई ऑन्कोकेअर ही कर्करोगावर उपचार करणारी साखळी स्वरूपाची डे-केअर संस्था आहे. ताराराणी चौक येथे हे डे-केअर सुरू आहे. येथे कॅन्सरतज्ज्ञ डॉ. अक्षय शिवछंद रुग्णसेवेत असतात.