धोकादायक ओढा, पाणीटंचाई अन् स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर! | पुढारी

धोकादायक ओढा, पाणीटंचाई अन् स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर!

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईसह स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. चौकाचौकात कोंडाळे केवळ नावालाच आहेत. काही भागात घंटागाडीचा पत्ताच नसतो. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आहे. भटक्या कुत्र्यांची दहशत भटक्या कुत्र्यांची दहशत सार्‍यांनाच सतावणारी आहे. सायंकाळनंतर चौकाचौकात कुत्र्यांच्या झुुंडी दिसून येतात. रात्री दहानंतर रस्त्यावरून जाणे धोक्याचे ठरते आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मागे कुत्र्यांच्या झुंडी लागलेल्या असतात. तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला; पण सद्यस्थितीत ही समस्या सार्‍यांना भेडसावत आहे.

ओढ्यांमुळे आरोग्याची समस्या सम्राटनगर  येथील मालती अपार्टमेंटलगतचा ओढा डोकेदु:खीचा ठरला आहे. कचरा, टाकाऊ साहित्य आणि साचलेला गाळ वेळीच न काढल्याने ओढ्यातील पाणी रस्त्यावर पसरले जाते. आठवड्यापूर्वी झालेल्या पावसामुळे ओढ्यातील पाणी रहिवाशांच्या घरात शिरले होते. परिणामी, दुर्गंधीसह आरोग्याच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागले. भविष्यात धोकादायक ओढ्यामुळे आरोग्याची मोठी समस्याही निर्माण होऊ शकते. प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीच नियोजन करणे गरजेचे आहे.

प्रभागांतर्गत उंचवट्यावरील वस्त्यांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. नवीन पाईपलाईनमुळे सखल भागात मुबलक पाण्याचा पुरवठा होत असला तरी उंचवट्यावरील सुविधांसाठीही नव्याने उपाय शोधण्याची गरज आहे. प्रभागातील रस्त्यांसह गटारीच्या कामांची पूर्तता झालेली असली तरी गटारी तुंबण्याचे प्रमाण अधिक आहे. शाहूनगर, जगदाळे कॉलनी, रेणुका, पंत मंदिर पिछाडीला झालेल्या बंदिस्त गटारीमुळे आरोग्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

माऊली चौक अतिक्रमणाच्या विळख्यात!
राजारामपुरी येथील मध्यवर्ती माऊली चौकाच्या सुशोभिकरणाची केवळ चर्चाच आहे. सुशोभिकरण दूरच… सायंकाळनंतर अतिक्रमणाचा विळखा पडलेला असतो. वाहतूक नियंत्रणासाठी सक्षम यंत्रणा असतानाही त्याचा अंमल होत नाही. परिणामी, चौकात वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. कचर्‍यांचे ढीग लोकप्रतिनिधींसह आरोग्य यंत्रणांच्या नजरेला येत नाहीत का, असा नागरिकांचा सवाल
आहे.

खराब रस्त्यामुळे हाडांचे विकार
गॅसलाईन तसेच पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी प्रभागातील बहुतांशी रस्त्यांचे खोदकाम झाले आहे. कामाची पूर्तता होऊनही मुरूमीकरण अथवा डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला नाही. परिणामी महावीरनगर, जगदाळे कॉलनी, प्रतिभानगर, तीनबत्ती झोपडपट्टी परिसर, शाहूनगर परिसरात रस्त्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे हाडांचे विकार बळावत आहेत, असा नागरिकांचा सूर आहे.

कोल्हापूर : दिलीप भिसे
पन्नास टक्क्यांवर उच्चभ्रू आणि तितक्याच प्रमाणात श्रमिकांची वसाहत असा नवीन रचनेत राजारामपुरीसह सम्राटनगर, अंबाई डिफेन्स परिसर प्रभाग क्रमांक 17 आकाराला आला आहे. सम्राटनगर, अंबाई डिफेन्ससह प्रतिभानगरपासून शाहूनगरपैकी माऊली चौक ते वि.स.खांडेकर शाळा, नार्वेकर मार्केटपर्यंतचा परिसर प्रभागात समाविष्ट आहे. दाटीवाटीच्या वसाहतीतून प्रवाहित ओढा धोकादायक ठरतो आहे.

प्रभागातील इच्छुक : डॉ. दास्मिता सत्यजित जाधव, छाया उमेश पोवार, सर्जेराव साळोखे, काका पाटील, वसंत कोगेकर, रोहित पोवार, सत्यजित जाधव, दिनेश पसारे, अक्षय पाटील, सुरेश ढोणुक्षे, राजू हुंबे, उमेश पोवार, इंद्रजित शिंदे, अक्षय पाटील.

प्रभाग क्रमांक 17 ची व्याप्ती…
सम्राटनगर, अंबाई डिफेन्स, प्रतिभानगर, शाहूनगरपैकी माऊली चौक, रेड्याची टक्कर, नार्वेकर मार्केट, वि.स.खांडेकर शाळा, जागृतीनगर, मालती अपार्टमेंट, सम्राटनगर गार्डन, बी.एस.एन.एल ऑफिस, केदार अपार्टमेंट, दत्तमंदिर.

जनतेने नगरसेवक म्हणून संधी दिल्याने नागरी सुविधांसाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अमृत योजनेतून माने कॉलनीत 1 कोटी 30 लाख खर्चाची पाण्याची टाकी उभारण्यात आली. 7 कोटी 50 लाख खर्चाची नवीन पाईपलाईन, नवीन गटर्स बांधकामासह स्वच्छतेला प्राधान्य दिले. स्वनिधीतून टँकरने पाणीपुरवठा, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, कोरोना काळात धान्य, औषधे वाटप. उर्वरित विकासकामांसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे.
– आ. जयश्री जाधव, माजी नगरसेविका

शेल्टर योजनेतून चारशेहून अधिक घरात शौचालयांची योजना प्रभावीपणे राबविली. आरोग्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ड्रेनेजलाईन बंदिस्त करून घेतली. रस्ते, गटारीसह पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाईपलाईनची पूर्तता. प्रतिभानगर ते रेड्याची टक्कर रस्त्याला मंजुरी, पूर्ततेसाठी पाठपुरावा सुरू, सार्वजनिक शौचालयाच्या ठिकाणी व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल उभारण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. ओढ्यातील गाळ काढण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात नागरिकांना स्वखर्चातून धान्य, औषधे, कपडे, रुग्णांना फळे वाटप, टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. पाच वर्षांच्या काळात विकासकामांचा डोंगर उभारण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
– छाया उमेश पोवार, माजी नगरसेविका

Back to top button