

आशिष शिंदे
कोल्हापूर : ‘जीवन अमूल्य आहे... एका क्षणाच्या नैराश्याने ते कायमचे अंधारात ढकलू नका’ असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. कारण, शुल्लक गोष्टींवरून वाढणारा राग, ताण-तणाव, व्यसनाधिनता, त्यातून निर्माण होणारे नैराश्य यामुळे त्या क्षणापर्यंत जगण्यावर प्रेम करत, हसत-खेळत, दंगा-मस्तीत असलेल्या ‘डीअर जिंदगी’ला कंटाळून आत्महत्येचा दुर्दैवी पर्याय तरुणाई स्वीकारत असल्याचे भयाण वास्तव समोर येत आहे. कोल्हापुरात गेल्या चार वर्षांत 162 जणांनी आत्महत्या केल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार चार वर्षांत जिल्ह्यात एकूण 162 व्यक्तींनी जीवन संपवले आहे. यामध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 125 पुरुष आणि 37 महिलांची संख्या पाहता पुरुषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत तिप्पट आहे. नैराश्याच्या विळख्यात अडकल्यानंतर आत्महत्येचे पाऊल उचलत असलेल्यात 18 ते 25 वयातील व्यक्ती अधिक असल्याचे मानोसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी 7 लाख 27 हजारांहून अधिक लोक जीवन संपवतात. त्यात भारतासारख्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील प्रमाण 73 टक्के इतके मोठे आहे. विशेषतः 15 ते 29 वयोगटातील तरुणांतील मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आत्महत्या असल्याने ते एक गंभीर आव्हान बनत चालले आहे.
विविध व्यसनांनी नैराश्यात भर
18 ते 25 वयोगटातील तरुणांमध्ये करिअरची स्पर्धा आणि गेमिंग डिसऑर्डरमुळे भविष्याची चिंता वाढली असून, ताण विसरण्यासाठी घेतलेला ऑनलाईन गेम्सचा आधार आता व्यसनात बदलला आहे. यामुळे झोप आणि अभ्यासावर परिणाम होऊन चिडचिडेपणा व नैराश्य वाढण्यात भरच पडत आहे. वाढत्या नैराश्यातून तरुणांच्या मनात आत्महत्येचा टोकाचा विचार येण्याची भीती असते.