गडहिंग्लज : चांगले काम करणार्या माणसाला बदनाम करण्यासाठी ‘ईडी’चे कटकारस्थान करून कुटुंबासह मला तुरुंगात डांबून स्वतः आमदार होण्याचे स्वप्न पाहणार्यांनी हिंमत असेल, तर लढून आमदार व्हायला पाहिजे. कोणाला तुरुंगात घालून आमदार होता येत नाही, अशी टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. गडहिंग्लज येथे 16 कोटींच्या विकासकामांच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
स्वागत महेश सलवादे यांनी केले. रेश्मा कांबळे, गुंडया पाटील, रमेश रिंगणे, किरण कदम, नरेंद्र भद्रापूर यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना ना. मुश्रीफांनी तुम्ही मत देताना माझा अन् समोरच्या विरोधकांचा विचार करूनच द्या. मी किती विकासकामे केली, तुमच्या घरांमध्ये कोणकोणत्या योजना आणल्या, माझा संपर्क, कार्यक्रमानिमित्त येणे या सर्वांचा विचार करूनच निर्णय घ्या, असे सांगताना विरोधकांवर टीकेची जोरदार झोड उठवली.
त्यांना आमदार होण्यासाठी मला तुरुंगात घालण्याचा घाट घातला होता. त्यामुळेच आम्हाला तिकडे जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याची कल्पना देऊनच आम्ही निर्णय घेतला होता. यापूर्वी राजांनी त्यांच्याच गुरूंना फसवले असून, फडणवीसांकडून विविध कामे करून पहिल्यांदा युती धर्म न पाळता अपक्ष लढून पक्षाचा घात केला. त्यानंतर पुन्हा साडेचार वर्षे स्वतःच्या फायद्याची विविध कामे करून घेऊन आता पुन्हा फडणवीसांना धोका दिला आहे. त्यांनी मला गुरुदक्षिणा शिकवू नये. शरद पवार हे आमचे दैवत होते, आहे व राहणार. अनेक कठीण प्रसंगांत आम्ही शरद पवारांसोबत राहून थोडी का होईना गुरुदक्षिणा दिली आहे. त्यांनी फडणवीसांना कोणती गुरुदक्षिणा दिला आहे, त्यांनाच माहिती असा सवाल करत जोरदार टीका केली. ‘गोडसाखर’चे अध्यक्ष प्रकाश पताडे व राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेंद्र भद्रापूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. आभार रश्मीराज देसाई यांनी मानले.
यावेळी ना. मुश्रीफ यांनी विरोधकांवर टीका करताना फडणवीस यांनी राष्ट्रपतींच्या दौर्यावेळी आपल्याला हे राजे कायम विविध पत्रे घेऊन येत असल्याचे सांगताना यामध्ये केवळ अधिकार्यांच्या बदल्याच असायच्या असे सांगितले. यामुळे केवळ बदल्यांमध्ये दलाली अन् कमिशन खाणे राजेपदाला शोभते का, अशी विचारणा केली.