![Ichalkaranji : वॉटर एटीएमचा निधी परत जाणार? दीड वर्षांत झालं नाही ते महिन्यात कसं होणार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F03%2Fichalkaranji.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
इचलकरंजी ; विठ्ठल बिरंजे : शहरासाठी मंजूर असलेले ९९ शुध्द पाण्याचे प्रकल्प अर्थात वॉटर एटीएमचा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. ३१ मार्च नंतर याबाबतची कार्यवाही होणार असल्याने तत्पूर्वी वॉटर एटीएम सुरू करण्याचे आव्हान प्रशासनसमोर आहे. तथापि, दीड वर्षांत जे घडले नाही ते महिन्याभरात कसे होणार, असा सवाल उपस्थित झाला आहे. (Ichalkaranji)
कृष्णा योजनेच्या गळतीमधून जमिनीतील अशुध्द पाणी पाईपलाईनमध्ये मिसळते. पुढे तेच पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी दिल्यानंतर त्यातून साथीचे रोग पसरण्याची भीती आहे. या आधारे आमदार प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर शहरात १०० वॉटर एटीएम बसवण्याची घोषणा केली.
वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे चार कोटींचा निधीही पालिकेकडे वर्ग केला. कमी पडणारी रक्कम पालिकेने खर्च करुन एटीएम सुरू करावीत यासाठी आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर ५९ शेड उभारण्यात आले. मात्र उर्वरित कामांना गती मिळाली नाही.
रंग, वास, चव बदलणार काय?
मुळात 'आरओ' वॉटरची संकल्पना होती. मात्र त्यात बदल करून वॉटर एटीएम उभारण्याचा निर्णय घेतला. सध्या हे एटीएम सेंटर कूपनलिकेच्या पाण्याला जोडण्यात येणार आहेत. मुळात इचलकरंजी शहरात रासायनिक सांडपाणी जमिनीत मुरत असल्यामुळे कूपनलिकेचे पाणी पिले जात नाही. असे असताना हे एटीएम त्या पाण्याला जोडण्यात येणार आहेत.
एटीएम शेड उभारण्यासाठी ठेकेदाराने काम सुरू केले की त्या प्रभागातील नगरसेवक काम थांबवतात. आपल्याला हव्या त्या ठिकाणी शेड उभारण्यास सांगतात. त्यामुळे निश्चित केलेल्या जागेवर काम बंद करून नगरसेवक सुचवेल त्याठिकाणी काम करावे लागते. या त्रासाला कंटाळून ठेकेदाराने काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे.
सर्वांना मोफत पाणी अशी संकल्पना होती. मात्र त्यात बदल करून मिळकत भरणार्यालाच 'वॉटर एटीएम कार्ड' दिले जाणार आहे. पाच माणसांच्या कुटुंबाला एक कार्ड दिले जाणार आहे. एटीएम मशिनमध्ये कार्ड स्वॅप केल्यास 20 लिटर्स शुध्द पाणी मोफत देण्याची योजना आहे.
मंजूर वॉटर एटीएम : ९९
तयार शेड : ५९
अद्याप शेड नाहीत : ४०
उपलब्ध एटीएम मशिन : ४२
पाणी, लाईट उपलब्ध : ३२
एकूण खर्च : ५.३५ कोटी
कामाची मुदत : ३ वर्षे