

सुनील सकटे
कोल्हापूर : महायुती सरकारच्या साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या शेती पंपांच्या वीज बिल थकबाकी माफ योजनेमुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ३ लाख ६२ हजार ५७२ शेतकऱ्यांना लाभ होणार असून त्यांचे वीज बिल शून्य होणार आहे. या शेतकऱ्यांची ३ हजार ९३ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सव्वा लाख शेतकर्यांच्या शेतीपंपांच्या थकबाकीचे ५१६ कोटी माफ होणार असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या एकूण ३ लाख ६२ हजार ५७२ शेतकर्यांची तीन हजार ९३ कोटी ६७ लाख रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. सरकारच्या आश्वासनामुळे शेतकर्यांनी थकबाकी भरली नाही. त्यामुळे थकबाकीवर व्याज वाढत असल्याने शेतकर्यांची डोकेदुखी ठरली होती. अखेर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकबाकी माफीची घोषणा केल्याने शेतकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
दै. ‘पुढारी’च्या पाठपुराव्यास यश
शेतकऱ्यांचे चालू बिल माफ केल्याने शेतीपंपाच्या थकबाकीचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे ‘चालू बिल शून्य थकबाकीचे काय?’ या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने याबाबत सातत्याने आवाज उठवून पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आल्याने शेतकर्यांनी दै. ‘पुढारी’चे आभार मानले आहे.