पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने बंद, ९ जणांना वाचवले | पुढारी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग पाणी आल्याने बंद, ९ जणांना वाचवले

निपाणी : मधुकर पाटील : गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर (NH4) सौंदलगा हद्दीत वेदगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. गुरुवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग वर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. सद्यस्थितीत महामार्गावरून ५ ते ६ फूट पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक थांबली आहे.

निपाणी परिसरात पावसाचा धुमाकूळ

निपाणी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे सध्या सर्वत्रच मुसळधार पाऊस पडत आहे.

दरम्यान गुरुवारी मध्यरात्री पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने यमगरणी ते सौंदलगा या टापूत असलेल्या लहान भुयारी मार्गापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरापर्यंत महामार्गावर 10 ते 12 फूट पाणी आले आहे.

या पुराच्या पाण्यात अडकून पडलेली कार वाहून गेली असून मालवाहू ट्रक अक्षरशः पुराच्या पाण्यात अडकून पडला आहे.

दरम्यान कारमधील आठ जणासह ट्रक चालक असे एकूण 9 जण आश्‍चर्यकारकरीत्या बचावले असून त्यांची सुटका रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासनाने केली आहे.

असे असले तरी सध्या पावसाचा जोर कायम असल्याने किमान पुढील तीन दिवस तरी महामार्ग बंद राहणार असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

दरम्यान महामार्गावर पाणी आल्याने अत्यावश्यक आंतरराज्य सेवेकरिता जिल्हा व तालुका प्रशासनाने निपाणी तालुक्यासाठी राखीव असलेल्या एनडीआरएफच्या तुकडीला पाचारण केले.

ही तुकडी दुपारपर्यंत घटनास्थळी दाखल होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दिली.

दरम्यान मध्यरात्री कोल्हापूर येथून बेळगावकडे जाणारी कार व ट्रक पाण्यातच अडकून पडले.

यावेळी रस्ते देखभाल जयहिंद कंपनीसह पोलिस प्रशासनाने मोठ्या शर्यतीच्या प्रयत्नाने कारमधील ५ व ट्रक मधील ३ अशा ८ जणांना सुखरूप बाहेर काढले. असून दोन्ही वाहने पाण्याचा अडकून पडले आहेत.

दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने तहसील व पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली आहे.

त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिले आहेत.

गुरुवारी मध्यरात्री पाच फुटाने वाहणारे पाणी शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास पाणी पातळीत वाढ होऊन १० फूटाने पाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होते.

त्यामुळे २०१९ सालाची पुन्हा पुनरावृत्ती झाली असून राष्ट्रीय महामार्ग गेल्या पाच वर्षात तिसऱ्यांदा बंद झाला आहे.

घटनास्थळी तहसील, पोलिस प्रशासन, तळ ठोकून

दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून तहसील प्रशासनाने चिकोडी येथे राखीव असलेल्या एनडीआरएफ तुकडीला पाचारण केले.

सकाळी दहानंतर प्रत्यक्षात अत्यावश्यक सेवा तसेच रुग्णांना सेवा दिली जाणार आहे.

दैनिक पुढारीने गुरुवारीच पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या शुक्रवार पर्यंत होणार महामार्ग बंद असा अंदाज व्यक्त केला होता. अखेर पुढारीच हा अंदाज खरा ठरला आहे.

दरम्यान सौंदलगा व यमगरणी वेदगंगा नदी पुलावर दोन्ही बाजूला स्थानिक ग्रामपंचायतीच्या तहसील पोलिस तसेच जिल्हा पातळीवरील प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्ग तळ ठोकून आहेत.

दोन्ही बाजूला पोलीस प्रशासनाने बॅरिकेड्स व आदी साहित्य लावून नागरिकास वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

एनडीआरएफ पथक येऊन पाहणी केल्याशिवाय कोणत्याही नागरिकांना व वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

दोनच दिवसात महामार्ग पाणी…

गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसामुळे 2019 साला ची पुनरावृत्ती होऊन पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाणी होऊन महामार्ग बंद पडला आहे.

दोन दिवसात परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.

सध्या ही मुसळधार पाऊस सुरू आहे.

निपाणी तालुक्यातील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली असून अनेक गावांना महापुराने वेढा दिला आहे.

त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच तहसील व पोलीस प्रशासन अडकून पडलेल्या नागरिकांच्या स्थलांतरासाठी कामाला लागले आहे.

वाहतुकीचे असे नियोजन…

राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक कोगनोळी सीमा तपासणी नाका येथून तर बेळगावहून कोल्हापूर व पुणे मुंबईकडे होणारी वाहतूक महामार्गावरील तवंदी घाट येथील शिपूर फाटा येथून मागे वळविण्यात येत आहे.

जनजीवन विस्कळीत….

दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने निपाणी परिसरातील जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे.

अनेक गावांना तसेच नदीकाठावरील रस्त्यांवर पाणी घुसल्याने शिवाय अनेक गावाच्या वेशीवरील मंदिरे पाण्याखाली गेली.

संबंधित गावातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे त्यामुळे प्रशासनाची पुरती तारांबळ उडाली आहे.

Back to top button