कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : भरवस्तीत बेछूट गोळीबार करून दहशत माजविणाऱ्या मानसिंग बोंद्रे याच्या दोन साथीदारांना राजवाडा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री बेड्या ठोकल्या आहेत. आणखी तिघे साथीदार पोलिसांच्या रडारवर आले आहेत. काल (दि. १५) मानसिंग बोंद्रे याला अटक करण्यात आली.
संशयितांनी फरार काळात बोंद्रेला आश्रय देऊन रसद पुरविल्याचे उघडकीस आल्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी आज (दि.१६) रविवारी सांगितले.
संशयित मानसिंग बोंद्रे फरार काळात कोठे कोठे आसरा घेतला होता. त्याला कोणी मदत केली याची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत निष्पन्न होणाऱ्या संशयिताला अटक करून कठोर कारवाई करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले.
अंबाई टँक कॉलनी परिसरात गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग बोंद्रेला परवा शनिवारी मध्यरात्री रत्नागिरी जिल्ह्यात अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अटक केलेल्या संशयितांना आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मालमत्तेच्या वादातून अभिषेक बोंद्रे आणि त्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्याचा आरोप बोंद्रे याच्यावर आहे. याबाबत अभिषेक बोंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर बोंद्रे पसार झाला होता.
पोलिसांनी यापुर्वी त्याचा साथीदाराला अटक केली होती. मात्र, बोंद्रे पसार झाला होता. यानंतर त्याने जिल्हा न्यायालयात केलेला अटकपूर्व जामीनाचा अर्ज फेटाळल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, बुधवारी त्याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयातूनही फेटाळण्यात आल्याने त्याला केव्हाही अटक होणार होती.