

कुडाळ : शिवसेना शिंदे गटाच्या माजी महिला आघाडी जिल्हा प्रमुख व ओबीसी व्हीजेएनटी महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांनी शिंदे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. आ. नीलेश राणेंसह काही पदाधिकाऱ्यांबाबत आपली कोणतीही नाराजी नाही. मात्र स्थानिक पातळीवर संघटनेचे काम करताना घुसमट होत असल्याने तसेच तेंडोली व पिंगुळी हे मतदारसंघ शिवसेनेचे बालेकिल्ले असतानाही ते म भाजपला सोडल्यामुळे आपण नाराज असून, पक्ष सदस्यासह पदाचा राजीनामा देत असल्याचे श्रीमती कुडाळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पुढील दोन दिवसांत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगत तेंडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष लढण्याचे संकेत त्यांनी दिले.
वर्षा कुडाळकर यांनी सोमवारी सकाळी पिंगुळी येथील आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत पक्ष सोडण्यामागील भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, शिंदे शिवसेना गटाची स्थापन झाली तेव्हा या पक्षात प्रवेश करणारी कुडाळ तालुक्यातील मी एकमेव महिला पदाधिकारी होते. सामान्य कार्यकर्ती म्हणून नव्हे, तर विविध पदांवर काम केलेली अनुभवी पदाधिकारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी देण्यात आली. ठाकरे शिवसेनेत असताना उपविभाग, विभागप्रमुख, तालुका व उपजिल्हाप्रमुख अशी सर्व पदे मी यापूर्वी सांभाळली असून, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मला जिल्हाप्रमुख पद देण्यात आले. जिल्हाप्रमुख म्हणून कुडाळ-मालवणसह कणकवली, देवगड, वैभववाडी असे पाच तालुके माझ्याकडे होते. या पाचही तालुक्यांमध्ये संघटना वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम केले. आणि आणखी करायचेही होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत काम करण्यासाठी कोणताही वाव उरलेला नाही. संघटना वाढीसाठी केलेले प्रयत्न विचारात घेतले जात नाहीत. डावलले जात असेल तर मानसिक त्रास सहन होतो आणि म्हणूनच या पक्षातून व पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तेंडोली व पिंगुळी हे शिवसेनेचे बालेकिल्ले असतानाही ते मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपात भाजपला देण्यात आल्याने आपली तीव्र नाराजी आहे. याच कारणांमुळे शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे कुडाळकर यांनी जाहीर केले.
तेंडोली गटातून अपक्ष लढणार!
राजीनाम्यानंतर सध्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही. पण पुढील दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे स्पष्ट करत वर्षा कुडाळकर म्हणाल्या की, आगामी जिल्हा परिषद निवडणूक तेंडोली मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवणार असून, जनतेच्या पाठबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.