कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पणदूर आणि वेताळबांबर्डे गावांना जोडणारा हातेरी नदीवरील जुना ब्रिज कम बंधारा सोमवारी (दि.23) सायंकाळी अतिवृष्टीने आलेल्या पुरात वाहून गेला. त्यामुळे पणदूर गावातील ग्रामस्थांचा जवळचा मार्ग बंद झाला आहे. परिणामी आता ग्रामस्थ व शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे. सोमवारी दुपारनंतर कुडाळ तालुक्याच्या सह्य पट्ट्यात ढगफुटी सदृश धुवाधार पाऊस कोसळला. या पावसाने वेताळबांबर्डे हातेरी नदीला पूर आला. या पुराच्या पाण्याने पणदूर साईलवाडी येथील श्री सातेरी मंदीर समोरील हातेरी नदीवरील पणदूर व वेताळबांबर्डे गावांना जोडणा-या ब्रिज कम बंधा-याचा बराचसा भाग वाहून गेला. या ब्रिज कम बंधा-याचा वापर पणदूर गावातील ग्रामस्थ वेताळबांबर्डे येथे ये-जा करीत असायचे.
पणदूर गावातील ग्रामस्थ, शालेय मुले कुडाळ व अन्य भागात जाताना वेताळबांबर्डे बसस्टॉप येथे जाण्यासाठी तसेच नदीपलिकडील शेतीत जाणारे शेतकरी या बंधा-याचा वापर करीत होते. मात्र अतिवृष्टीत हा बंधारा वाहून गेल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. पणदूर मधील ग्रामस्थांना पणदूर तिठा मार्गे ये - जा करावी लागणार आहे. यात त्यांना लांबचा फेरा मारावा लागणार आहे. याबाबतची माहीती मिळताच भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष तथा माजी सरपंच दादा साईल, माजी सरपंच शामसुंदर सावंत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, आबू सावंत, संगिता साईल, पोलिस पाटील देऊ सावंत यांच्यासह ग्रा.पं.सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.