

ओरोस : जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला आणि घरा घरात पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे शासन आदेश असताना तारकर्ली येथील मीठ बावकर कुटुंबीयांना नळ कनेक्शनद्वारे पाणी देण्यास पाणीपुरवठा आणि ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याच्या प्रश्नी वयोवृद्ध महिलांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर उपोषण करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर तारकर्ली बांदवाडीयेथील काशीबाई सखाराम मिठबावकर (वय ८५) आणि शीला भिजाजी मिठबांवकर (वय ७०) या जेष्ठ महिला कुटुंबीयांनी आम्हाला कोणी पाणी देता का या प्रश्नासाठी उपोषण केले. आपल्या घरापर्यंत ग्रामपंचायत तारकर्ली कार्यक्षेत्रातील कुटुंबीया समवेत वल्लभार्जीत पारंपरिक राहत असलेल्या घरामध्ये पिण्याचे पाणी देण्यास ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्यासाठी वण वण करावी लागत आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम सध्या सुरू आहे .त्याच योजनेच्या माध्यमातून जीवन प्राधिकरणच्या अत्याधित येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून २०२३ सालापासून या योजनेची कार्यवाही सुरू झाली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वेक्षण करताना आम्हा कुटुंबांचे सर्वप्रथम सर्वेक्षण यादीत नाव समाविष्ट करण्यात आले. आम्ही जेष्ठ वयोवृद्ध महिला पाण्यापासून वंचित असून नळ कनेक्शनद्वारे पाणी मिळावे असे अर्ज निवेदन देण्यात आले असे या जेष्ठ महिला म्हणाल्या.
ग्रामपंचायतीकडून जागेच्या हरकतीच्या कारणाखाली नळ पाणी योजनेचे कनेक्शन देण्यास काहीसा विरोधच असल्याबाबत समर्पक खुलासा मागविण्यात आला होता. आम्ही ज्येष्ठ महिला कुटुंबांना नळ पाणी योजनेचे कनेक्शन लाभापासून वंचित ठेवल्याने कर्तव्यात कुसूर करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीवर आणि संबंधितांवर कारवाई करा असेही त्यांचे वैयक्तिक म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षदर्शी भेट घेऊन याची माहिती घेतली.
केंद्र सरकारच्या हर घर नळाद्वारे पाणी या योजनेला या ग्रामपंचायतीने काहीसा हरताळ फासल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे या कुटुंबांचे म्हणणे आहे. आपल्याकडून याबाबत ठोस कारवाई करा आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करा. आम्हाला नळ पाणी योजनेच्या माध्यमातून पाणी मिळाले पाहिजे. पाईप टाकलेल्या जागेपासून काही मीटर अंतरावर येणारी जागा आमची समाईक वडिलोपार्जित कुटुंबातील जमीन असून या योजनेतून आम्हाला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी काशीबाई सखाराम मिटबावकर, शीला भिकाजी मिठबावकर यांच्यासह भिसाजी सदाशिव मिठबावकर या ज्येष्ठ व्यक्तींबरोबर श्याम भिसाजी मिठगावकर, श्वेता श्याम मिठबावकर, चिन्मय श्याम मिठगावकर आदींनी या प्रश्नी उपोषण करत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग ग्रामपंचायत तारकर्ली यांचेही या प्रश्नावर लक्ष वेधले. ठोस तोडगा काढण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा विभागाने लक्ष देण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच संबंधित ग्राम पंचायतीला लेखी पत्राद्वारे कळविले जाईल असे सांगितले.