Smart Meter Controvercy | स्मार्ट मीटर विरोधात जनहित याचिका दाखल करणार!
सावंतवाडी : मुख्यमंत्री व उर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतरही सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारी करण्याबरोबरच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. तर लोकांचा विरोध झुगारून तसेच जबरदस्ती करून ठेकेदार घरात स्मार्ट मीटर बसवत आहेत,याबाबत अधिकारी उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.
ठाकरे शिवसेनेचे शहर संघटक निशांत तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील पर्णकुटी विश्रामगृहावर ही बैठक घेण्यात आली. मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, ठाकरे सेनेचे प्रवक्ते आशिष सुभेदार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, देवेंद्र टेमकर, मनसेचे शहराध्यक्ष राजू कासकर, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, पिंट्या देसाई, शैलेश गौंडळकर, राघवेंद्र नार्वेकर, रफिक मेमन, तौसिफ आगा, वीज संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय लाड, विकास नार्वेकर, महेश नार्वेकर, अनिकेत मोर्ये, विनय गायकवाड आदी उपस्थित होते.
बैठकीनंतर अॅड. केसरकर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही आज सर्वपक्षीयांनी एकत्र येवून बैठक घेतली. केवळ सावंतवाडी तालुक्याचा विचार करता चार हजाराहून अधिक घरांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र हे बसवताना अनेक ग्राहकांना विश्वासात घेतले नाही. विशेष म्हणजे हा मीटर बसवल्यानंतर पूर्वी सरासरी 500 रु. येणारे वीज बिल तब्बल अडीच हजारापर्यंत पोहोचले आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्य लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागण्यासारखा आहे. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये नाराजी आहे.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात आपण स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सक्ती करणार नाही, असे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी वीज कंपनी व संबंधित ठेकेदाराची माणसे कोणालाही विश्वासात न घेता या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवत आहेत. घरी कोण नसतानाही हे मीटर बसविण्यात येत आहेत. या विरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत. काही झाले तरी हा प्रकार सहन केला जाणार नाही. त्यामुळे या प्रकाराच्या विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. श्री.तोरसकर म्हणाले, ज्या लोकांनी विरोध केल्यानंतर सुद्धा त्यांच्या घरी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत त्यांची भेट घेऊन जन आंदोलनात त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
श्री.नार्वेकर म्हणाले, केवळ आंदोलन उभारून कोणताही फायदा होणार नाही. तर हा प्रकार मोडीत करण्यासाठी जनहित याचिका दाखल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयारी करूया. आता कोल्हापूर खंडपीठ सुरू झाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन या ठिकाणी जनहित याचिका दाखल करता येऊ शकते. त्यादृष्टीने पदाधिकार्यांनी अभ्यास करावा आणि पुढील निर्णय घ्यावा. आंदोलन सुरूच राहील मात्र त्यासाठी ठोस निर्णय म्हणून जनहित याचिका दाखल करणे हे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी त्याला मान्यता दिली.

