

कणकवली : जुलै महिन्याचे १०-१२ दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्गात पाऊस सक्रिय झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाच्या सरीवर सरी पडत होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. तर पावसामुळे रखडलेली भात लावणी आता वेगात सुरू झाली असून, ही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत. चांगल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला.
अल निनोच्या प्रभावामुळे अनियमित असलेला पाऊस आता जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून सक्रिय झाला आहे. गेले दोन दिवस चांगला पाऊस पडत असून, काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. रविवारी रात्रभर पावसाचा जोर अधिक होता तर सोमवारी दिवसभर अधूनमधून उघडीप देत पावसाच्या सरी सुरू होत्या.
आज रात्री ११.३० वा. पर्यंत ३.० ते ३.१ मी. उंचीच्या लाटा
इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओसियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस या हैदराबाद येथील संस्थेने सोमवारी दुपारी २.३० वा. ते मंगळवारी रात्री ११.३० वा. पर्यंत ३.० ते ३.१ मी. उंचीच्या लाटा विजयदुर्ग ते तेरेखोल किनाऱ्यादरम्यान उसळण्याचा इशारा दिला आहे.