

उदय बापर्डेकर
मालवण : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील सौ. अंतरा हर्षद दुखंडे या विवाहितेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत कालावल खाडीमध्ये आढळून आला. या घटनेला पंधरा दिवस उलटले तरी पोलिस तपासाबाबत कोणीतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. या दिरंगाईबाबत संताप व्यक्त करत वायंगणी गावातील महिलांनी शनिवारी मालवण पोलीस ठाण्यात धडक देत तपासाबाबत पोलिसांना विचारणा केली. या प्रकरणाचा तातडीने तपास करून अंतरा हिच्या मृत्यू मागील सत्य परीस्थिती समोर आणावी, यामध्ये कुणी दोषी असल्यास त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना दिले. तातडीने योग्य व समाधानकारक तपास न झाल्यास महिला दिनावर बहिष्कार टाकू, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.
मालवण पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्याकडे वायंगणी मधील महिलांनी निवेदन सादर करत तपासाबाबत चर्चा केली. या निवेदनावर माजी सरपंच मालती जोशी, उपसरपंच समृध्दी आसोलकर, ग्रा. प. सदस्य संजना रेडकर, सोनाली वायंगणकर, अपर्णा देसाई, दिपिका राणे, क्षमा सावंत, वनिता राणे, वैशाली वायंगणकर, लीना सावंत, मंजिरी राणे, प्रज्ञा धुळे, रसिका सावंत, समृध्दी सावंत, स्वप्नाली बाईत, सुषमा सावंत, दीपांजली सावंत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शिक्षिका असणाऱ्या अंतरा दुखंडे या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये अत्यंत आदरणीय व विश्वासार्ह शिक्षिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे वायंगणी गावात तसेच पंचक्रोशी परिसरात भीती, संभ्रम व असुरक्षिततेचे वातावरण आहे. विशेषतः गावातील विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला असून महिलांमध्येही अस्वस्थता व भीतीची भावना निर्माण झाली आहे. त्यांच्या मृत्यूच्या घटनेला सुमारे पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या तपास प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलीस यंत्रणेच्या तपासाबाबत असंतोषाची भावना वाढत आहे, असे महिलांनी निवेदनात म्हटले आहे.
सौ. अंतरा दुखंडे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने, निष्पक्ष व पारदर्शक तपास होऊन सत्य परिस्थिती जनतेसमोर यावी व मृत व्यक्तीस न्याय मिळावा, या प्रकरणात समाधानकारक व पारदर्शक तपास न झाल्यास वायंगणी गावातील महिला व ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा पर्याय स्वीकारावा लागेल, एका महिलेला न्याय मिळत नसल्याने महिला दिन कार्यक्रमावर बहिष्कार टाकू तसेच गावच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकू, असेही महिलांनी सांगितले.