

नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या कासार्डे-जांभूळवाडी जि.प. शाळेच्या आवारात मालवाहू कंटेनर घुसला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने शाळा बंद होती, यामुळे अनर्थ टळला. रविवारी पहाटे २ वा. च्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्ग विभागाच्या कारभारावर स्थानिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
हा कंटेनर रविवारी पहाटे गोवा ते मुंबई जात होता. कासार्डे-जांभूळवाडी शाळेसमोर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट शाळेचे चिरेबंदी कंपाऊंड तोडून आवारात घुसला. यामुळे झालेला मोठा आवाज ऐकून साखर झोपेत असलेल्या स्थानिकांनी शाळेकडे धाव घेतली. अपघातग्रस्त कंटेनरच्या चालकाला बाहेर काढत त्याला धीर दिला. याबाबत महामार्ग प्राधिकरण उपविभाग खारेपाटण कार्यालयात पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शाळेसमोर बॅरिकेट उभारावेत; ग्रामस्थांची मागणी
या ठिकाणी दिवसा नागरिक व शाळकरी विद्यार्थी यांची वर्दळ असते. शाळेच्या परिसरात मुले खेळत असतात. हा अपघात दिवसा घडला असता, तर मोठा अनर्थ होण्याची भीती होती. या अपघातानंतर आता तरी महामार्ग प्राधिकरणने या शाळेसमोर बॅरिकेट उभारावेत तसेच संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.