Sindhudurg News: विजघर परिसरात टस्कराचा हैदोस; केळी, माड, सुपारीची झाडे उद्ध्वस्त

Sindhudurg News: विजघर परिसरात टस्कराचा हैदोस; केळी, माड, सुपारीची झाडे उद्ध्वस्त
Published on
Updated on


दोडामार्ग : विजघर परिसरात वीस दिवसांपूर्वी दाखल झालेल्या टस्कराने मोठ्या प्रमाणावर उपद्रव माजविला आहे. या कालावधीत टस्कराने जवळपास ८५५ केळी, १५ माड व १५० सुपारीची झाडे उद्ध्वस्त केली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ९ लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी चक्क पाच हत्तींचा कळप पाहून शेतकरी पूर्ण धास्तावला आहे. अन्नाच्या शोधात टस्कर थेट लोकवस्तीत शिरकाव करत असल्याने व दाखल हत्तींची संख्यादेखील वाढत चालल्याने ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Sindhudurg News

विजघर परिसरात वीस दिवसांपूर्वी टस्कराचे आगमन झाले. या टस्कराने तेथील शेतकऱ्यांच्या फळ बागायतींचे अतोनात नुकसान केले. त्यानंतर सहा दिवसांत टस्करासोबत एका पिल्लाचे दर्शन ग्रामस्थांना झाले होते. त्यांनी नारळ, सुपारी व केळी बागायतीत घुसून नुकसान केले होते. त्यामुळे या परिसरात नेमके किती हत्ती असावेत? याचा अंदाज लावणे मुश्किल झाले होते. टस्कर अन्नाच्या शोधात वारंवार लोकवस्तीतही येऊ लागला आहे. Sindhudurg News

बांबर्डे येथील एका शेतकऱ्याच्या घरालगत बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास टस्कर आला होता. एकवटलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केली व टस्कराला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. त्यानंतर अवघ्या तीन तासांच्या फरकाने रात्री १०.३० च्या सुमारास पाच हत्तींचा कळप वावरत असल्याचे ग्रामस्थांना दिसले. टस्कराला हुसकावण्यासाठी वनविभागही शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Sindhudurg News : हत्तींच्या कळपात पाच महिन्यांचे पिल्लू

एक टस्कर, एक मादी हत्ती व तीन पिल्ले असा मिळून पाच हत्तींचा कळप तेथे वावरत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिले. या कळपातील एक पिल्लू अवघ्या पाच महिन्यांचे आहे. पिल्लू अतिशय लहान असल्याने त्या पिल्लासहीत मादा ही बांबर्डे येथील जंगलातच वावरत होती. शिवाय इतर दोन पिल्ले देखील तिच्यासोबत होते. त्यामुळे फक्त टस्कर हा घाटीवडे व बांबर्डे परिसरात अन्नाच्या शोधात फिरत होता. याबाबत वनविभागाला विचारले असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे.

Sindhudurg News : हत्तींना रोखणे आवश्यक- ग्रामस्थ

फक्त एका टस्कराने उपद्रव माजवून शेतकऱ्यांचे सुमारे नऊ लाखांचे नुकसान केले आहे. सध्या काजूचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातच दाखल झालेल्या हत्तींमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. टस्कर घरालगत येत असल्याने ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. मात्र, हत्तींच्या कळपात पाच महिन्यांचे पिल्लू असल्याने या हत्तींना येथून पिटाळून लावणे आता अशक्य होणार असल्याचेही ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. हे हत्ती पुढील काळात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हत्तींना रोखून या परिसरातून हाकलून लावावे, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news