

कणकवली : गेले १५ दिवस हुलकावणी देणाऱ्या पावसाने रविवार सायंकाळपासून पुन्हा हलक्या स्वरूपात का होईना बरसायला सुरुवात केली. सिंधुदुर्गच्या विविध भागांत रविवारी दिवसभरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या, काही ठिकाणी पावसासोबत विजांचा कडकडाटही झाला. सुमारे ८ दिवसांनंतर पाऊस झाल्याने शेतकरी व नागरिक सुखावले आहेत. मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
या वर्षी ६ जून रोजी सिंधुदुर्गात मान्सूनचे आगमन झाले. मात्र त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता. ८ जूननंतर सुरुवातीचे काही दिवस सिंधुदुर्गात मान्सूनच्या हलक्या सरी काेसळत होत्या, मात्र गेल्या आठवडाभर पावसाने अक्षरशः पाठच फिरवली होती. निरभ्र आकाश, कडक ऊन असे उन्हाळी वातावरण जिल्ह्यात पाहायला मिळत होते.
सिंधुदुर्गवासीय पावसाची प्रतीक्षा व उकाड्याने हैराण होत असतानाच रविवारी सकाळपासून ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दुपारनंतर त्यात काहीशी वाढ होत सायंकाळी अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गही सुखावला आहे. सध्या जिल्ह्यात मान्सूनसाठीचे पोषक वातावरण असून येत्या काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. २५ जून नंतर मान्सून अधिक वेगाने सक्रिय होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.