

मालवण ः मालवण-फोवकांडा पिंपळ येथील रहिवासी आणि प्रगतशील बागायतदार गणेश मारुती आचरेकर यांचा बागेतील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 2.30 वा.च्या सुमारास कोळंब-कातवड येथे घडली. दरम्यान आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी मुलानेही विहिरीत उडी घेतली होती, मात्र स्थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे मुलाचे प्राण वाचले.
गणेश आचरेकर यांची कोळंब-कातवड भागात आंबा बाग आहे. काही दिवसांपूर्वी या बागेला आग लागली होती, ज्यामध्ये झाडांना पाणी पुरवणारे पाईप जळून खाक झाले होते. जळालेले पाईप बदलण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गणेश आचरेकर आणि त्यांचा मुलगा चिन्मय सोमवारी सकाळी बागेत गेले होते. दरम्यान सुमारे 45 ते 50 फूट खोल असलेल्या विहिरीत उतरून गणेश आचरेकर शिडीच्या सहाय्याने पाईप दुरुस्तीचे काम करत होते. या विहिरीत 12 ते 15 फूट पाणी आहे. काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते पाण्यात पडले. आपले वडील पाण्यात बुडत असल्याचे पाहून चिन्मयने आरडाओरड केली व वडिलांना वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी मारली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो देखील बुडू लागला. त्याच वेळी जवळून जाणाऱ्या एका नेपाळी कामगाराच्या हे लक्षात ही बाब येताच त्याने आरडाओरड करून परिसरातील तरुणांना मदतीसाठी बोलावले. त्यानुसार साईल परब, अनिष धुरी, बाबल धुरी, निलेश परब, शशांग धुरी, सागर धुरी, निलेश बागवे, दीपक पवार, दत्तगुरू बागवे, महेश राणे या तरुणांनी विहिरीत उड्या मारत शर्थीचे प्रयत्न करून चिन्मयला सुखरूप बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने गणेश आचरेकर यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह विच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक यतीन खोत यांनी घटनास्थळी धाव घेत आचरेकर कुटुंबाला धीर दिला. पोलीस पाटील भिकाजी परब यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद तेली आहे. पोलीस निरीक्षक्त मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक गणेश माने आणि सुशांत पवार अधिक तपास करत आहेत.आचरेकर यांच्या बागेला यापूर्वीही आगीमुळे मोठे नुकसान सोसावे लागले होते. पुन्हा एकदा बाग उभी करण्यासाठी धडपडत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.