

देवगड : विजयदुर्ग बंदरात टगबोटीचा धक्का लागल्याने 'एम-२-एम प्रिन्सेस' या प्रवासी फेरीबोटीला किरकोळ हानी पोहोचली. त्याची दुरुस्ती सायंकाळी उशिरा पूर्ण झाल्यानंतर ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दुरुस्तीचा कालावधी लक्षात घेता फेरीबोट कंपनीकडून प्रवाशांनी मुंबईसाठी बुकिंग केलेल्या तिकिटाचे पैसे त्यांना परत केल्याचे व ही बोट प्रवाशांविना मुंबईला निघाल्याचे समजते.
कोकणातील जलवाहतुकीमधील मुंबई ते विजयदुर्ग या पहिल्या रो-रो सेवेचा शुभारंभ १ मार्च रोजी करण्यात आला आहे. या जलवाहतूक प्रकल्पाच्या शुभारंभाची पहिली फेरी 'एम-२-एम प्रिन्सेस' या प्रवासी फेरीबोटीने यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या फेरीबोटीची दुसरी फेरी बुधवारी विजयदुर्ग येथे दाखल झाली होती. गुरुवारी दुपारी ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने रवाना होणार होती.
याचदरम्यान विजयदुर्ग बंदरात या प्रवासी फेरीबोटीला टगबोटीचा धक्का बसला. यात प्रवासी फेरीबोटीला किरकोळ हानी पोहोचली. त्याच्या दुरुस्तीचे काम फेरीबोट व्यवस्थापनाकडून तात्काळ हाती घेण्यात आले. गुरुवारी या फेरीबोटीकरिता ३० प्रवाशांनी मुंबईसाठी तिकिटांचे बुकिंग केले होते. परंतु, दुरुस्तीच्या कारणामुळे प्रवाशांचा वेळ वाया जाऊ नये व प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेत संबंधित कंपनीने प्रवाशांना त्यांचे तिकिटाचे पैसे परत केल्याचे समजते. फेरीबोटीवरील काही कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने देवगडहून खासगी ट्रॅव्हल्सने मुंबईच्या दिशेने रवाना केले. परंतु, सायंकाळी उशिरा फेरीबोटीची दुरुस्ती पूर्ण होताच ही फेरीबोट मुंबईच्या दिशेने प्रवाशांविना रवाना झाली.