

कणकवली : नाम फाऊंडेशन आणि लघु पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने कणकवली गडनदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गडनदी पुलापासून ते मराठा मंडळ बंधाऱ्यापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ काढण्यात आल्याने बंधाऱ्यापासून गडनदी पुलापर्यंत मुबलक प्रमाणात पाणी साठा होणार आहे.
लघु पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत नद्यांमधील गाळ काढला जातो. यांत्रिकी विभाग स्वतंत्रपणे काम करतो तर नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने ल.पा. विभाग स्वतंत्रपणे गाळ काढतो. नाम फाऊंडेशन ही स्वयंसेवी संस्था असून राज्यभरात जलसंधारण व गाळ काढण्याचे काम करते. याच नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने ल.पा. विभागामार्फत कणकवली गडनदीपात्रातील गाळ काढण्याची मोहिम चार दिवसापूर्वी हाती घेण्यात आली होती. नाम फाऊंडेशनचे स्वतःचे पोकलॅन आणि जेसीबी आहेत. जिल्हा नियोजनमधून आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नाम फाऊंडेशनला इंधन खर्च म्हणून प्रति घनमीटर ३१ रुपये मंजूर करण्यात आले होते. तर ल.पा.च्या यांत्रिकी विभागाला प्रति घनमीटर ८३ रुपये इंधन खर्चासाठी मंजूर केले जातात. नाम फाऊंडेशन मार्फत कणकवलीतील गडनदीपात्रातील गाळ काढून तो काठावर दोन स्टेप करुन ठेवला आहे. पुन्हा पावसाळ्यात तो गाळ खाली येवू नये याची जास्तीत जास्त खबरदारी घेण्यात आल्याचे ल.पा.चे उपविभागीय अधिकारी विकास परब यांनी सांगितले.
मे महिन्यात देवगड तालुक्यातील दहिबांव नदीतील गाळ काढला जाणार आहे. नाम फाऊंडेशन मार्फत या हंगामात खारेपाटण, कुडाळ, वेंगुर्ले आदी भागातील नद्यांमधील गाळ काढण्यात आला. पुढील वर्षी कणकवली कनकनगर बंधाऱ्यादरम्यानचा गाळही काढला जाणार आहे. ल.पा.च्या यांत्रिकी विभागामार्फत गडीनदी पात्रातील दारिस्ते सह काही भागातील गाळ काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात पुराची तीव्रता कमी होणार असून उन्हाळ्यात नद्यांमध्ये प्रदीर्घकाळ पाणी साठा टिकून राहण्यास मदत होणार आहे.