

कासार्डे : वीज ग्राहकांच्या घरातील वीज मीटर ग्राहकांच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय बदलण्यात येऊ नये, अशा प्रकारची आग्रही मागणी लेखी निवेदनाद्वारे ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शन संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांनी केली. त्यांनी रत्नागिरी येथील महावितरणचे कोकण परिमंडळ मुख्य अभियंता अनिल डोळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संघटनेच्या वतीने लेखी निवेदन सादर केले.
कोकण परिमंडळ रत्नागिरी विभागात (सिंधुदुर्ग, रत्नागिरी) मोठ्या प्रमाणावर घरगुती वीज ग्राहकांचे मीटर बदलून स्मार्ट मीटरची जबरदस्तीने जोडणी केली जात आहे. हे अन्यायकारक आहे. यासाठी वीज ग्राहकांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी परवानगी मिळाल्यानंतरच वीज ग्राहकांचा मीटर बदलावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने मुख्य अभियंता अनिल डोळे यांच्याकडे करण्यात आली. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाला तशा सक्त सूचना द्याव्यात असे सांगण्यात आले. संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कणकवली तालुका अध्यक्ष मंगेश चव्हाण उपस्थित होते.