

कासार्डे : गेले तीन ते चार दिवस जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर घरे, गोठ्यांवर झाडे पडल्याने कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. सखल भागात पाणी साचल्याने भात लावणी कामालाही ब्रेक लागला होता. सहाजिकच जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र बुधवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. दिवसभरात काही जोरदार सरी कोसळल्या मात्र दोन सरींमध्ये तास दोन तासांचा अवधी असल्याने कुठलाही अडथळा येत नव्हता.
पावसाने विश्रांती घेताच शेतकऱ्यांनी भात लावणी कामाला वेग दिल्याचे चित्र दिसून आले. बुधवारी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतळ्यांमध्ये पाॅवर टीलरची फटफट व शेतकऱ्यांची लगबग दिसून आली. जून महिन्यात पावसाने दांडी मारल्याने यावर्षी पेरण्या उशीराने झाल्या. सहाजिकच भात लावणी कामालाही उशिराने सुरुवात झाली. जिल्ह्यात आता पर्यंत भात लावणीचे सुमारे ३० ते ३५ टक्के काम झाले असून उर्वरित काम आटोपण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.
पुढील ४ दिवस ग्रीन अलर्ट
सिंधुदुर्गात गेले आठ दिवस धुवाधार पाऊस झाल्या नंतर आता पुढील चार दिवस हवामान खात्याने सिंधुदुर्गसाठी ग्रील अलर्ट म्हणजेच अत्यंत कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.