

निर्णय राऊत
आंबोली : आंबोली वर्षा पर्यटन हंगामाला उशिरा, पण दमदार सुरुवात झाली होती. मागील दोन वीकेंडला सुमारे दीड लाखांहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. मात्र, गेले १० दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने आंबोली धबधबा, बाबा धबधबा यांच्यासह परिसरातील सर्वच धबधब्यांच्या प्रवाहात मोठी घट झाली होती. त्यामुळे आंबोलीत वर्षा पर्यटनाला आलेल्या पर्यटकांचा मोठा हिरमोड झाला होता. तसेच आंबोली पर्यटन व्यावसायिकदेखील चिंतेत होते. तर आंबोलीत १० दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवारी (ता. १६) जोरदार पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने आंबोली धबधबा, बाबा धबधबा आदी धबधब्यांच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. ही आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या असंख्य पर्यटकांसाठी जणू मोठी आनंदाची वार्ता आहे.
दरम्यान, वर्षा पर्यटन हंगामात आंबोलीतील मुख्य धबधबा, बाबा धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, कावळेसाद पॉईंट, महादेवगड पॉईंट आदी सर्वच पर्यटनस्थळांवर दरदिवशी हजारो पर्यटक भेट देतात; तर वीकेंडला किमान लाखवर पर्यटक गर्दी करतात. विशेषत: आंबोलीतील धबधब्यांवर भिजण्याची प्रत्येक पर्यटकांत सर्वात मोठी क्रेझ असते. पण गेले १० दिवस आंबोलीत पाऊस नव्हता. परिणामी धबधब्यांसह नदी प्रवाहात ही मोठी घट झाली होती.