

आंबोली : सुमारे १० दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात गेले दोन दिवस समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे वर्षा पर्यटकांमध्ये उत्साह संचारला असून, जिल्ह्यातील आंबोली या प्रमुख वर्षा पर्यटनस्थळासह नापणे, सावडाव, मांगेलीसह अन्य सर्वच प्रमुख धबधब्यांवर पर्यटकांच्या गर्दीचा महापूर दिसून आला. आंबोलीतील सर्वच पर्यटनस्थळांवर एकाचवेळी हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. परिणामी, आंबोली घाटमार्ग तसेच सर्वच पर्यटनस्थळांवर वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत होती.
वीकेंड असल्याने वर्षा पर्यटनासाठी शनिवारपासूनच हजारो पर्यटक आंबोलीत दाखल झाले होते. त्यामुळे आंबोली परिसरातील सर्वच हॉटेल्स, होम स्टे हाऊसफुल्ल होते. रविवारी पहाटेपासूनच आंबोली मुख्य धबधबा, हिरण्यकेशी तीर्थक्षेत्र, महादेव गड पॉइंट, कावळेसाद पॉइंट, बाबा धबधबा, नांगरतास धबधबासह घाट परिसरात हजारो पर्यटकांची गर्दी दिसत होती. या पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी समस्या उद्भवत होती.
पर्यटकांच्या गर्दीत मुलगी बेपत्ता
पर्यटकांच्या गर्दीत एका कुटुंब नातेवाईकांसह आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आले होते. यादरम्यान त्यांची १५ वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी लागलीच शोधमोहीम सुरू केली. घाटातील सर्व गर्दीच्या आणि मुख्य धबधबा ठिकाणी जाऊन शोध घेतला असता, ती मुलगी घटनास्थळापासून सुमारे ६ कि.मी. वरील धबधबा क्र.५ जवळ सुखरूप मिळून आली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.