

osargaon toll naka latest news
कणकवली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट देत ओसरगाव टोलसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. जिल्ह्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन ओसरगाव टोल नाक्यावर एमएच ०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून देत विशेष सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पिवळी पाटी असणाऱ्या व्यावसायिक गाड्यांना ५० टक्के सवलत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. संपूर्ण जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आशीर्वादही घेतले. आपल्या एक्स हँडलवरसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'विधिमंडळातील माझे सहकारी मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!' असे आज सकाळीच ट्विट करत शुभेच्छा दिल्या होत्या.
वर्षा निवासस्थानी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद घेतले. आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणे कुटुंबीयांना आणि भारतीय जनता पक्षाला नेहमीच भरभरून आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जनतेसाठी काहीतरी देण्याची भावना मनात होती ओसरगाव टोलच्या मुद्द्यावर जिल्ह्यातील नागरिक, व्यावसायिक यांनी टोलमाफीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर आपण सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करताना ओसरगाव टोल नाक्यावर एमएच ०७ क्रमांकाच्या वाहनांसाठी स्वतंत्र लेन उपलब्ध करून दिली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. नारायण राणे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे नितेश राणे यांनी आभार मानले.
पिवळ्या नंबर प्लेटच्या व्यावसायिक वाहनांना टोल दरात ५० टक्के सवलत
पिवळ्या क्रमांकाच्या (व्यावसायिक) वाहनांसाठी संबंधित कंपनीने टोल दरात ५० टक्के सवलत जाहीर केल्याची माहितीही त्यांनी दिली. हा निर्णय जिल्ह्यातील व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्रासाठी दिलासादायक ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.