

नांदगाव : पाणीपुरवठा सुरळीत करा... नाहीतर खुर्ची खाली करा... अशा घोषणा देत कोळोशी-गावठण येथील नागरिकांनी ग्रामपंचायत कोळोशी कार्यालयात घागर मोर्चा काढत सरपंचांना जाब विचारला. सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी पंधरा दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
सरपंच गुरुनाथ आचरेकर, उपसरपंच अतुल गुरव, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, सदस्य सुशील इंदप यांनी नागरिकांशी चर्चा केली. या चर्चेसाठी ग्रामस्थ दीपक इंदप, विजय इंदप, आबा इंदप, चंद्रकांत इंदप, श्रीधर साळकर, अनंत साळकर, मारुती कदम,गणपत इंदप, श्रीराम कदम,तातू कदम,नंदू कदम, चंद्रकांत कदम, प्रमोद कदम, बबन इंदप, पंकज इंदप, प्रणाली इंदप, शारदा इंदप, सुप्रिया इंदप, पूजा साळकर आदी महिला उपस्थित होते.
गावठण येथील नागरिकांचे म्हणणे आहे की, सध्या गावात चाकरमानी आले असून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने हाल होत आहेत. कपडे धुण्यासाठी नदीवर जाण्याची वेळ महिलांवर येत आहे. आम्ही सुट्टीच्या दिवसांत मुलाबाळांना घेऊन गावी येतो. अशा वेळी जर ही परिस्थिती असेल तर ही गोष्ट चांगली नसून सरपंचांनी यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. यापुढे तरी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे सांगण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून कोळोशी-गावठण येथील नळधारकांना पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी ग्रामपंचायत कोळोशी येथे घागर मोर्चा नेऊन सरपंच गुरुनाथ आचरेकर यांना निवेदन देत जाब विचारला. सरपंच गुरुनाथ आचरेकर यांनी आपण यासाठी पंधरा दिवसांच्या आत कटाक्षाने लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नक्की प्रयत्न करू, ही समस्या सोडविण्यासाठी पूर्ण लक्ष देण्यात येईल, असे आश्वासन दिले.