

नांदगाव : सतत पडणार्या पाऊसामुळे कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीची मुंबई- गोवा महामार्गालगत पियाळी नदीच्या बाजूला असणारी पाणीपुरवठा करणारी विहीर जमीनदोस्त झाली. यामुळे विहिरीच्या सिमेंट कठड्यासह लोखंडी बार व पाणी उपसा करणार्या पंपासह लाखो रूपयांचे नुकसान झाले. कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी भेट देत याची पाहणी केली.
कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे, ग्रा.पं.सदस्य सहदेव उर्फ आण्णा खाडये यांच्यासह पंचायत समिती अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचार्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणी नतंर ताताडीने पंचनामा करून सुमारे पंचवीस लाखाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले आहे.
सदर विहीर 40 वर्षे जूनी होती. सध्या सध्या सतत पडणारा पाऊस व पियाळी नदीला येणारा पुराच्या पाण्याचा वेढा यामुळे विहीरीच्या आजुबाजुला भूस्खलन झाल्याने विहीर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या विहीरीच्या माध्यमातून कासार्डे जांभळगाव, सरवणकरवाडी, कासार्डे दक्षिण गावठण परीसरात पाणीपुरवठा होत होता. या घटनेची दखल गेत ग्रामपंचायताने पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी उपाययोजना केल्या आहेत. तसेच कोसळलेल्या विहीरीच्या व नळयोजनेच्या डागडुजीसाठी तातडीने निधी मंजूर व्हावा यासाठी पंचायत समिती व जि. प. पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरवा करणार असल्याचे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते, सहदेव खाडये यांनी सांगितले.