

देवगड ः खाडीमध्ये मुलासोबत पागाने मच्छीमारी करण्यासाठी गेलेल्या तांबळडेग-मधलीवाडी येथील राजाराम सीताराम तारी (वय 75) यांचा पाण्यात तोल जाऊन पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे 2.30 वा.च्या सुमारास तांबळडेग किरावन खाडी येथे घडली.
तांबळडेग- मधलीवाडी येथील राजाराम तारी हे त्यांचा मुलगा रूपेश (45) यांच्यासमवेत गुरुवारी रात्री दीड वाजण्याचा सुमारास तांबळडेग किरावन खाडी येथे पागाने मच्छीमारीसाठी गेले होते. तासभर ते पागाने मच्छीमारी करीत होते; मात्र मासळी मिळाली नाही म्हणून घरी जाण्यापूर्वी जाळे टाकत असतानाच त्यांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने ते बुडाले. पहाटे अडीज वाजण्याचा सुमारास ही घटना घडली. यावेळी त्यांचा मुलगा रुपेश यांना वडील पागाने मच्छीमारी करीत असलेल्या ठिकाणी दिसले नाहीत म्हणून त्यांनी आसपास पाहिले; मात्र ते न दिसल्याने त्यांनी तत्काळ जवळच असलेल्या
घरातील ग्रामस्थांना घडलेल्या घटनेबाबत सांगीतले. यावेळी काका मुणगेकर आदी ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाऊस व अडचणीची वाट असल्याने शोधकार्यात अडथळे आल्यामुळे रात्री शोधमोहिम राबविता आली नाही. शुक्रवारी सकाळी तांबळडेग येथील स्थानिक मच्छिमार व ग्रामस्थ मधुकर धावडे, गुरू कुबल, बाबा बांदकर, काका मुणगेकर, नंदू धुरी, सद्गुरू कुबल, अर्जुन सारंग आदींनी खाडीपात्रात शोधमोहिम राबविली. सकाळी 7.15 वा.सुमारास राजाराम तारी यांचा मृतदेह खाडीच्या पाण्यात आढळून आला. तारी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक विवाहीत मुलगी, सुना असा परिवार आहे. गेली कित्येक वर्षे ते मच्छिमारी या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत होते. त्यांचा निधनाने तांबळडेग गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची खबर मुलगा रूपेश यांनी देवगड पोलिसात दिली. अधिक तपास पोलिस हवालदार गणपती गावडे करीत आहेत.