

ओरोस : मिरगाचा तो सुगंध, मातीचा तो ओलावा आणि पहिल्या पावसाच्या सरीवर शेतात उतरणारा कोकणी शेतकरी... हे चित्र यंदा बदलण्याची भीती आहे. ‘एल निनो’च्या संकटामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता असून भातशेतीचे गणित कोलमडण्याच्या भीतीनेे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
कोकणात मे महिना संपत आला की शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागतात. शेतकरी मान्सूनची आगमनाची चातका प्रमाने वाट पाहतो. मात्र या वर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनपूर्व पा ऊस बरसलाच नाही. परिणामी या वर्षी मान्सूनच्या आगमना नंतरच भात पेरण्या कराव्या लागल्या. दरवर्षी मान्सूनपूर्व पावसात भात पेरणी होते, तर मान्सूनच्या आगमना नंतर मृग नक्षत्र सुरू होताच पहिल्या टप्प्यातील भात लावणी सुरू होते. मात्र या वर्षी भात पेरणीलाच विलंब झाल्याने भात लावणीचा हंगाम ही लांबणीवर पडणार आहे, दुसरीकडे ‘अल निनो’च्या प्रभावामुळे या वर्षी पावसाचे प्रमाण कमी रहाण्याचा इशारा हवामान विभागाने दिल्याने ऐन भात लावणी हंगामात पावसाने दांडी मारल्यास काय करायचे? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
भातशेती ही संपूर्णपणे पावसावर अवलंबून असते. पाऊस कमी झाल्यास रोपांची वाढ मंदावते, शिवाय भात रोपांवर कीटकजन्य व बुरशीजन्य रोगांचा प्रादुभार्व वाढतो. परिणम भात उत्पादनात कमालीची घट होते. या वर्षी खतांचे दर कमालीचे वाढले आहेत, तर इंधन दरवाड व टंचाई मुळे नांगरणीचे दरही वाढले आहेत तसेच मजुरीचे दरही वाढले आहेत. अर्थात भातशेतीच्या खर्चातही वाढ होणार आहे. यात भात उत्पादन घटल्यास शेतकरी अडचणीत सापडणार आहे. या प्रतिकूल परिस्थीतीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.