

ओरोस ः स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा- 2 अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ 1 ते 20 जानेवारी कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी केले आहे.
प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेचे उच्चतम मानक राखत ग्रामीण भाग स्वच्छ व सुंदर बनवणे, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर आणि दैनंदिन स्वच्छतेचे पालन, घरगुती कचर्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे, परसबाग व सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझरखड्ड्यांचा वापर करणे हे या अभियानाचे उद्दिष्टे आहेत.
या अभियानात स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांचा 26जानेवारी रोजी ग्रामसभेत प्रशस्तीपत्र, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करून इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व शौचालयांच्या स्वच्छतेबाबत नियमांचे पालन करावे. यासाठी गटविकास अधिकारी, पं.स.विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. महिला बचत गट व ग्रामस्थांनी या अभियनात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक विशाल तनपुरे यांनी केले आहे.
अभियान कालावधी: 1 ते 20 जानेवारी 2025
पडताळणी कालावधी: 21 ते 24 जानेवारी 2025
पात्र कुटुंबांना निमंत्रण: 25 जानेवारी 2025
प्रशस्तीपत्र व सन्मान: 26 जानेवारी 2025