

* ग्राहकांचा प्रश्नांचा भडीमार, अधिकारी निरुत्तर
* मान्सूनपूर्व डागडुजी करण्यास कमी पडल्याची कबुली
* दिरंगाई होणार नसल्याचे महावितरणचे आश्वासन
Sawantwadi Power Consumers Meeting
सावंतवाडी : जिल्हाभरातील वीज ग्राहकांनी आपल्या विविध समस्या मांडत महावितरणचे अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांना भंडावून सोडले. ग्राहकांचा रोष व प्रश्नांचा भडीमार यामुळे महावितरणचे अधिकारी निरुत्तर झाल्याचे चित्र दिसून आले.
जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संजय लाड, जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक अॅड.नंदन वेंगुर्लेकर, राजेश राजाध्यक्ष, ह्यूमन राईटस् कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष सुनील भोगटे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष संजय गावडे, सचिव जयराम वायंगणकर, कणकवली तालुकाध्यक्ष गुरुनाथ तथा दादा कुलकर्णी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुभाष दळवी, सचिव भूषण सावंत, कुडाळ गोविंद सावंत, माजी पोलिस उपअधीक्षक दयानंद गवस आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील वीज समस्यांबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्याशी थेट चर्चा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्यावतीने सोमवारी वीज ग्राहक, व्यापारी व सरपंच यांची अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांच्याशी कुडाळ येथे बैठक आयोजित केली होती. यासाठी वीज ग्राहक, व्यापारी आणि सरपंच मोठ्या प्रमाणावर हजर होते. अधीक्षक अभियंता कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील प्रशिक्षण हॉलमध्ये ही बैठक घेण्यात आली. सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असून जिल्हाभरातील महावितरणच्या मुख्य वाहिन्या या डोंगरातून व जंगल झाडीतून जातात. पावसाळ्यात या वाहिन्यांवर झाडे पडून अनेकदा वीज खंडित होते. यासाठी सिंधुदुर्ग महावितरणला रत्नागिरी येथील मुख्य कार्यालयातून पावसाळा सुरू होण्यापूर्वी मुख्यत्वे करावयाची 33 कामे प्राधान्याने करून घेण्याचे सूचित केले होते.
यामध्ये लाईनला लागणारी झाडे छाटणी, गंजलेले वीज खांब, वाहिन्या बदलणे, रोहित्रांमधील ऑईल लेव्हल तपासणे आदी कामांचा समावेश होता. परंतु सिंधुदुर्ग महावितरणने प्रत्यक्षात कामे न करता केवळ कागदावरच कामे केल्याचा आरोप उपस्थित ग्राहकांनी केला. याच मुद्यांवर चर्चा घडवून आणली असता पावसाळा लवकर सुरू झाल्याने ही कामे करण्यास महावितरण कमी पडल्याची कबुली वीज अधिकार्यांनी दिली. पावसाची उघडीप मिळताच झाडांची छाटणी करून घेतली जाईल, अशी ग्वाही देत अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख यांनी पुढच्यावेळी अशी दिरंगाई होणार नसल्याचे सांगितले.
जिल्ह्याच्या गावागावातून आलेल्या वीज ग्राहकांनी आपल्या समस्यांचा पाढा अधीक्षक अभियंत्यांसमोर वाचला. वैभववाडी व कणकवली येथील समस्या संतोष नाईक, प्रणय बांदिवडेकर, गुरुनाथ कुलकर्णी यांनी मांडल्या. देवगड, मालवणच्या समस्यांबाबत नंदन वेंगुर्लेकर यांनी भाष्य केले. महेश खानोलकर, नारायण (बाळा) जाधव यांनी सावंतवाडी तालुक्यातील समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने मळेवाड येथे टाकण्यात येणारी नवीन वीज वाहिनी, सोनुर्ली सबस्टेशन, वायरमनची कमतरता, वीज कर्मचार्यांचे ग्राहकांशी बेशिस्त वर्तन, तक्रारीसाठी फोन न उचलणे आदी तक्रारी मांडल्या. वीज ग्राहक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळ बोर्डेकर यांनी सावंतवाडी शहरात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, विजेचे तकलादू साहित्य, स्मार्ट प्रीपेड मीटर याबाबत प्रश्न केले. यावर स्मार्ट प्रीपेड मीटरची सक्ती नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
कुडाळ तालुकाध्यक्ष गोविंद सावंत यांनी कुडाळमध्ये झाडे कटिंग न केल्याने दिवसभर वीज खंडित होत असल्याची तक्रार केली. पिंगुळी सरपंच आकेरकर यांनी गावात गार्डिंग करून घेण्याची सूचना केली. पावशी सरपंच वैशाली पावसकर यांनी महामार्गालगत गाव असून वीज खंडित होत असल्याने वाहिन्यांना लागणारी बांबूची बेट तोडण्याची मागणी केली. माणगाव खोरे येथील विकास माणगावकर, विजय माणगावकर यांनी व्यथा मांडल्या. तब्बल 60 किमीवरील शिवापूर येथून सरपंच सुनीता शेडगे आल्या होत्या. गावात 15-15 दिवस विजेचा पत्ताच नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी शिवापूर येथे पुढील बुधवारी सरपंच, ग्रामस्थ यांसह महावितरणच्या अधिकार्यांची बैठक आयोजित केल्याचे त्या म्हणाल्या. सरपंच संघटना अध्यक्ष राजन परब यांनी समस्यांचा पाढा वाचला. वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी साईनाथ आंबेडकर यांनी कसाल, ओरोस आदी भागातील समस्या मांडल्या.
वेंगुर्ला तालुक्यातील समस्या संजय गावडे यांनी मांडल्या. यामध्ये वेंगुर्ला शहरासाठी अभियंत्यांची मागणी, अखंडित वीज पुरवठा, जास्त क्षमतेची विद्युत रोहित्र आदीच्या मागण्या केल्या. दोडामार्ग तालुक्यातील समस्या तालुकाध्यक्ष सुभाष दळवी यांनी पोटतिडकीने मांडल्या. त्यांच्यासोबत सचिव भूषण सावंत, उपाध्यक्ष संजय गवस, सरपंच संघटना अध्यक्ष गोपाळ गवस आदींनीही समस्या मांडल्या. महालक्ष्मी वीज प्रकल्पासोबत करार करून दोडामार्ग तालुक्यासाठी महालक्ष्मीची वीज उपलब्ध करावी, मोडकळीस आलेले वीज खांब, जुनाट वाहिन्या, हाताला टेकतात अशा उंचीवर असलेल्या वीज वाहिन्या, जंगलातून गेलेली मुख्य वीज वाहिनी रस्त्याच्या कडेने अथवा भूमिगत करणे, विजेचा धक्का लागून मरण पावलेल्या मांगेली येथील युवकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे, अधिकार्यांची रिक्त पदे भरणे, भेडशी येथील सहा. अभियंता निलंबित करणे अशा अनेक मागण्या सुभाष दळवी यांनी केल्या.
जिल्हा समन्वयक अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी कधी आक्रमक तर कधी संयमाने घेत वीज ग्राहकांच्या समस्या मांडल्या. जिल्हा सचिव दीपक पटेकर यांनी नूतन अधीक्षक अभियंता यांच्याकडून जिल्ह्यातील वीज समस्या लवकरात लवकर सोडवून वीज ग्राहकांना अपेक्षित असे काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी जिल्ह्यातील मुख्य वीज समस्या का निर्माण होतात याचा अधिकार्यांनी सारासार विचार करून जिल्ह्यात अखंडित वीज पुरवठा व्हावा अशी मागणी केली.
बैठकीसाठी अधीक्षक अभियंता अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता कुडाळ वनमोरे, कणकवलीचे कार्य. अभियंता श्री. माळी यांच्यासह वीज ग्राहक संघटनेचे शिवराम आरोलकर, गोविंद कुडाळकर, शेखर गावडे, नारायण गोसावी, नेरूळ सरपंच भक्ती घाडीगावकर, किरण खानोलकर, वाल्मिकी कुबल, उद्योजक संजय तांडेल, अजय नाईक, बाव सरपंच अनंत आसोलकर, रानबांबुळी सरपंच परशुराम परब, घोडगे उपसरपंच विनायक गाडगीळ, मायकल लोबो, दोडामार्ग सरपंच सेवा संघाचे अनिल शेटकर आदी उपस्थित होते.
यावेळी कुडाळ पीएसआय रवींद्र भांड यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.