

सावंतवाडी: सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने परराज्यातून माणसे मागवली आहेत. या माणसांमुळे सावंतवाडी शहराची शांतता बिघडू शकते. पोलिसांनी यात वेळीच यात हस्तक्षेप करावा. उद्या निवडणुकीला गालबोट लागल्यास याला सर्वस्वी पोलिस प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला.
श्री. परब म्हणाले, निवडणुकीचे वातावरण जसजसे तापत आहे तसतसे भाजपकडून आपल्याच कार्यकर्त्यांचे वारंवार प्रवेश करुन घेतले जात आहेत. ग्रामीण भागातील कार्यकर्ते आणून भाजपकडून जाणूनबुजून फसवे प्रवेश व प्रचाराला गर्दी दाखवली जात आहे. अशा खोट्या प्रवेशांमुळे ते स्वतःला तसेच त्यांच्या नेत्यांना फसवत आहेत, अशी टीका संजू परब यांनी केली.
सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून परराज्यातील माणसे मागविण्यात आली आहेत. ही माणसे नागरिकांच्या घरात घुसून जबरदस्तीने फोटो घेण्याचे प्रकार करत आहेत. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. या गोष्टी पोलिसांनी थांबवाव्यात, अन्यथा त्यांना आमच्या पध्दतीने उत्तर देऊ असे ते म्हणाले.
याबाबत आपण वेळ पडल्यास जिल्हा पोलिस अधीक्षकांचीही भेट घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. प्रभाग 7 मध्ये नगरसेवक पदाचा उमेदवार म्हणून मी निवडणूक रिंगणात आहे त्यामुळे विरोधक माझा अपप्रचार करत आहेत. सावंतवाडी शहरात शिवसेनेची ताकद आहे. येथील जनता नेहमीच आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी राहिली आहे. भाजप पक्ष कुठे आहे हे 3 तारीखला निवडणुकीनंतर दिसेल, असा दावा श्री. परब यांनी केला.
...तर मल्टिस्पेशालिटीसाठी मोफत जागा द्या
भाजपने या निवडणुकीत विकासावर बोलण्यापेक्षा सावंतवाडीचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल का रखडले याचे उत्तर जनतेला द्यावे. निधी आला, टेंडर झाले तरीही हॉस्पिटलचे काम जागेच्या मालकांमुळे रखडले आहे. ज्या अटी-शर्ती घातल्या आहेत त्यामुळे हे हॉस्पिटल होऊ शकत नाही. जनतेवर एवढेच प्रेम असेल तर त्यांनी हॉस्पिटलसाठी मोफत जागा द्यावी व आपले प्रेम सिध्द करावे, असा टोला लगावला.
भाजपचे 50 टक्के कार्यकर्ते आमच्या सोबत
सावंतवाडी शहरातील भाजपच्या कित्येक कार्यकर्त्यांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यांचे 50 टक्के कार्यकर्ते माझ्या संपर्कात तसेच सोबत आहेत. त्यामुळे आम्हाला खोटे व फसवे प्रवेश घेण्याची गरज नाही. शिवसेनेकडे स्थानिक कार्यकर्ते आहेत ते नगरपालिका निवडणूक प्रचारात सोबत आहेत. आम्हाला बाहेरुन कार्यकर्ते आणण्याची गरज नाही असा टोला भाजपला परब यांनी लगावला.