

सावंतवाडी : सावंतवाडी शहराचे मुख्य आकर्षण असलेल्या मोती तला काठावर श्रीराम वाचन मंदिर ते नगरपरिषद कार्यालय यादरम्यान सुरू फुटपाथ आणि गटाराचे बांधकाम सध्या रखडल्याने शहरवासीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रेंगाळलेल्या कामामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून धुळीच्या साम्राज्यामुळे पादचारी आणि पर्यटकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरपरिषद कार्यालयासमोर गटार आणि फुटपाथ बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. या ठिकाणी काही भागात काळा दगड टाकून ठेवला आहे, तर काही ठिकाणी सेंट्रिंग करून काम अर्धवट स्थितीत सोडण्यात आले आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने किंवा खोळंबलेल्या अवस्थेत असल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. परिणामी, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनधारकांना तासन् तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे.
धुळीचा त्रास आणि स्वच्छतेचा अभाव
ज्या ठिकाणी गटार आणि फुटपाथचे सिमेंट काम पूर्ण झाले आहे, तिथे अद्याप स्टाईल्स बसवण्याचे काम बाकी आहे. बांधकाम साहित्यामुळे संपूर्ण परिसरात धुळीचे लोट उसळत आहेत. रस्त्यावर पसरलेली ही धूळ बाजूला सारून रस्ता स्वच्छ करणे आवश्यक असतानाही, ठेकेदार किंवा नगरपरिषद प्रशासनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
सावंतवाडी बाजारपेठेत येणारे नागरिक, स्थानिक रहिवासी आणि बाहेरून येणारे पर्यटक यांना या अर्धवट कामामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे. धुळीमुळे श्वसनाचे त्रास होत असून, बेशिस्तपणे पडलेल्या बांधकाम साहित्यामुळे अपघाताची भीतीही व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत आणि रस्त्यावरील धुळीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.